सीतचे हरण झाल्यावर तिचा शोध घेण्याची जबाबदारी हनुमानावर सोपविण्यात आली. त्यानेही ती चोखपणे पार पाडली. या शोध अभियानात त्याने लंकेतील अशोक वाटिकाची नासधूस तर केलीच या व्यतिरिक्त रावणाचे गर्वहरण करीत लंकेला आग लावण्याची कर्तबगारी केली.
हे सारे पराक्रम पार पाडून परतल्यावर रामाने त्यास उत्सुकता म्हणून लंकेबद्दलची इतर माहिती विचारली. काय, कशी आहे लंकेची रचना? याची चौकशी केली. हनुमानाने इत्यंभूत माहिती देताना सांगितले की, सारी लंका ही लाल रंगाची आहे. वृक्ष, शिळा, पाणी, फळं, घरं सारे काही लाल. हनुमानाच्या या वक्तव्याने प्रभू श्रीराम क्षणभर चमकले; पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तरळले.
हनुमान गेल्यावर जांबुवंताने श्रीरामाकडे संपूर्ण लंका लाल कशी असू शकेल? अशी पृच्छा केली. यावर राम म्हणाले, लंका मुळीच लाल नाही, पण आपल्या मन मस्तिष्कामध्ये आपण ज्या भावनांना स्थान देऊन ठेवतो, त्याचे प्रभाव आणि परावर्तन आपल्या वागण्या बोलण्यात उमटत जाते. हनुमानाचेही तसेच झाले. रावणाचं नाव काढताच हनुमानाचा चेहरा रागाने लालबूंद होत; तोच राग हनुमानाच्या डोळ्यात उतरल्याने हनुमानाचे डोळे लाल झाले असावेत आणि मग त्या आरक्त डोळ्यांने सारी लंका त्यास लाल दिसली असावी.
या स्थितीवर ओशो एक छान उदाहरण देत. ते सांगत, समजा तुमच्या हातात चहाचा पेला आहे, तुम्हाला कोणाचा धक्का लागला आणि चहा सांडला, अशा वेळी तुम्ही म्हणाल की, अमुक अमुकने धक्का दिला आणि चहा सांडला; पण हे उत्तर बरोबर नाही. खरंतर पेल्यात चहा होता म्हणून चहा सांडला. त्या जागी दुसरे काही असते, तर ते सांडले असते.
जे पेल्यात असेल तेच सांडणार. आपलेही तसेच आहे, आपण मनात ज्या कोणत्या गोष्टी समाविष्ट करून ठेवल्या आहेत, प्रत्येक धक्क्याला त्याचे वास्तविक स्वरूप उचंबळून बाहेर येत असते. जगराहटीत असे धक्के वारंवार लागतच असतात. म्हणून, आपण मनात काय साठवत आहोत, याचे परीक्षण वेळोवेळी करायला हवं, कारण या गोष्टी आपल्या मन:स्वास्थ्यावर प्रभाव टाकत असतात.
आपण ज्याचे चिंतन करतो, तसे घडत जातो.
आपण काय पाहतो, काय वाचतो, काय ऐकतो यावर मनाचा प्रवाह ठरत असतो. आपली उठबस कोणा बरोबर आहे हे खूप महत्त्वाचे असते. संगत खूप परिणामकारक ठरते. वाल्या कोळीचे उदाहरण घ्या. तो “मरा मरा’च्या जागी “राम राम’ बोलू लागला आणि सैतानातून संत निर्माण झाला. ज्याला आपण वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखतो. त्यांनी जसे चिंतन केले तसे ते घडत गेले. आपल्यालाही स्वभावाचे सौष्ठव जपण्यासाठी आपल्या विचारांचे योग्य पोषण करणे गरजेचे आहे. आपण कोणत्या विचारांशी संलग्न व्हावे याची काळजी आपणच घ्यायला हवी.
धैर्य, मौन, कृतज्ञता, स्वाभिमान, निश्चिंतता, माणुसकी, यांचे मनन जीवनमान उंचाविण्यास उपकारक ठरते, तर संताप, मूर्खपणा, द्वेष, घृणा इत्यादींचे आकर्षण अपायकारक ठरते.