– अरुण गोखले
एकदा एक भक्त देवाच्या देवळात गेला. देवास नमस्कार करून हात जोडत देवास त्याने प्रार्थना केली, “देवा! आजपासून मी माझ्या जीवनाचा एक स्वतंत्र वेगळा प्रवास सुरू करतो आहे. या जीवनाच्या नव्या वाटेवर मला नेहमीच कोणाच्या तरी मदतीची, आधाराची, सहकार्याची गरज लागणार आहे. तेव्हा माझी तुला अशी विनंती आहे की, देवा! तू माझा हात धर.’
असे म्हणून त्या भक्ताने खरोखरच आपला हात देवाच्या पुढे केला. त्या भक्ताची श्रद्धा, भक्ती पाहून देवासही मोठे कौतुक वाटले. देव त्याला म्हणाला, “”अरे इतकंच ना. मग त्यात काय आहे. हे बघ मी तुझा हात धरला काय किंवा तू माझा हात धरलास काय, दोन्हीचा अर्थ एकच नाही का?”
भक्त देवाला म्हणाला, ”
“नाही. देवा मी तुझा हात धरणे आणि तू माझा हात धरणे यात फार मोठा फरक आहे?” देवानेच आश्चर्याने विचारले, “”काय रे बाबा, अरे दोघांचा हात एकमेकांच्या हातात आला म्हणजे झाले ना? मग त्यात फरक तो काय?”
नम्रपणे हात जोडीत भक्त देवास म्हणाला, “”देवा! त्याचं काय आहे की समजा जर मी तुझा हात धरला तर उद्या कदाचित जीवनातल्या एखाद्या मोहाच्या, लोभाच्या, स्वार्थाच्या क्षणी असे होऊ शकते की मी धरलेला तुझा हात हा माझ्या हातातून सोडला जाईल. त्या क्षणी कळणार नाही, पण मी नकळत तुझ्यापासून अलिप्त होईन, एकटा पडेल. पण देवा! हा माझा भक्त आहे, असे म्हणून तू माझा हात धरशील तर मला खात्री आहे की तू कोणत्याही प्रसंगात कोणत्याही क्षणी माझा हात सोडणार नाहीस.
तू मला निराधार करणार नाहीस, मी दूर जाऊ लागलो, तुझा आधाराचा हात सोडवू लागलो तरी तू तो सोडवू देणार नाहीस. तू मला कधीही एकटा पाडणार नाहीस कारण तू माऊली आहेस. तू कनवाळू आहेस. तूच निज भक्तांचा सर्वतोपरीने सांभाळ करणारा आहेस.
देवा! मला हे पुरतेपणे ठाऊक आहे की तू ज्याला आपला म्हणून धरून ठेवतोस, त्याला तू जन्मजन्मांतरीही दुरावा देत नाहीस. त्याचा धरलेला हात सोडत नाहीस. म्हणून म्हणतो देवा! मी नको तर तू माझा हात धर.” देवाने स्मितहास्य करत “मी सदैव तुझ्यासोबत असेल, माझा आशीर्वादाचा हात नेहमी तुझ्या डोक्यावर असेल’, असे म्हटले.