जागतिक वन्यजीव सप्ताह सुरू; भारतात सर्वाधिक जैवविविधता
वन्यजीव संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागॄती करण्याच्या उद्देशाने जागतिक वन्यजीव सप्ताह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. भारतीय वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्याच्या महान उद्देशाने अथक प्रयत्नांनी 1952 मध्ये गंभीर पावले उचलण्यात आली. त्यावेळी सर्वप्रथम हा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानंतर भारत सरकारने वन्यजीव मंडळाची स्थापना केली आणि दरवर्षी जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा करण्यास सुरुवात झाली.
वन्यजीवांचे संरक्षण, त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य वन्यजीव मंडळ करते. वन्यजीव सप्ताहात संस्था, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा, प्रदर्शने आयोजित केली जातात. हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती यामुळे होणाऱ्या मानवी प्रगतीबरोबरच निसर्ग संरक्षण, वन्यजीव संरक्षण व विस्थापन ही काळाची गरज आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा जागरूक सहभाग आवश्यक आहे. मानवी प्रगती व वन्यजीव संरक्षण हे एकमेकांशी जोडलेले आहेत, म्हणूनच वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे आहे.
आपला देश दुर्मिळ वनौषधी आणि प्राण्यांचे माहेरघर आहे. आपली अशी समजूत आहे की, वन्यजीव य्हणजे जंगलातील प्राणी; परंतु त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व अधिवासातील सजीवांचा समावेश होतो. उदारहणार्थ वाळवंट, जंगले, पावसाळी जंगले, सखल प्रदेश, गवताळ प्रदेश, शहरी प्रदेशातील सूक्ष्म जीव, सस्तन प्राणी आणि गवतापासून मोठ्या वृक्षांचा यामध्ये समावेश होतो.
भारतात विविध प्रकारचे प्राणी, दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. बांगला वाघ हा भारतीय उपखंडातील मूळ पांढरा वाघ आहे. इंडोकिनीज वाघ, एशियाटिक सिंह, भारतीय आणि इंडोकिनीज बिबट्या, चितळ, हंगुल, क्लाउडेड बिबट्या, एशियन हत्ती, गेंडा, बर्फातील बिबट्या, बाराशिंग्यासह मृगांच्या (हरिण) प्रजाती आणि इतर प्रदेशातील वन्यजीव असून ते 120 हून अधिक राष्ट्रीय उद्याने, 18 जैवराखीव आणि 500 हून अधिक अभयारण्यांमध्ये संरक्षित आहेत.
जगातील सवाधिक जैवविविधता व दुर्मिळ वन्यजीव असलेले प्रांत भारतात आहेत. 36 जैवविविधिता हॉटस्पॉटही आहेत. जागतिक सर्वेक्षणानुसार भारत हा 16 मेगा डायव्हर्सिटी देशांपैकी एक आहे. जगातील जैवविविधतेच्या 60 ते 70 टक्के जैवविविधता भारतात आहे. वन्यजीव ही पृथ्वी आणि मानवाला मिळालेली अमूल्य भेट आहे. वन्यजीव हा शब्द केवळ वन्यप्राण्यांनाच नव्हे तर पक्षी, कीटक, झाडे, सूक्ष्म जीव यासह सर्व प्रकारच्या जीवनाचा विचार करतो.
पृथ्वीवर निरोगी वातावरण व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी, वनस्पती आणि सागरी प्रजाती मानवाइतक्या, किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अन्नसाखळीत विशिष्ट स्थान आहे. या अन्नसाखळीत मानवाचे अस्तित्व नसले तरी कोणत्याही प्राण्याचे, वनस्पतीचे अडणार नाही; पण माणूस सोडून एखादा सूक्ष्म जीव किंवा सस्तन प्राणी नसेल तर पूर्ण अन्नसाखळीच कोलमडून पडेल. इको सिस्टीम (परिसंस्था) म्हणजे अन्नसाखळीतील वेगवेगळ्या सजीवांमधील आपापसातील संबंध होय.
मानवी लोकसंख्या मूलभूत गरजांसाठी कॄषी उत्पादनांवर व वनस्पतींवर अवलंबून असते.
पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीसाठी वन्यजीव व परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते; परंतु दुदैंवाने आज बऱ्याच प्राणी आणि पक्षी प्रजाती धोक्यात आहेत. शहरीकरण, शेतीसाठी मानवाने प्राणी व वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास मानवाने नष्ट केला आहे. फर, दागिने, मांस, चमड्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, तस्करी करणे, त्याचबरोबर प्रदूषण, अतिक्रमण, कीटकनाशकांचा अतिवापर ही वन्यजीव नष्ट होण्याची कारणे आहेत. मानवाने औद्योगिक क्रांती व प्रगतीच्या नावाखाली वन्यजीवांपुढे व निसर्गापुढे मोठी आव्हाने ठेवली आहेत.
आता आपण वन्यजीव वाचविण्याचा व संरक्षणाचा विचार केला नाही तर मानवी ऱ्हासासही सामोरे जावे लागेल, हे निश्चित. माणूस म्हणून पृथ्वी, पर्यावरण, वन्यजीव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:चे जतन व संरक्षण ही आपली मोठी जबाबदारी आहे. निसर्गाचा, समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून आपण आपल्या घरापासूनच त्या दिशेने पावले उचलायला पाहिजेत. प्रत्येकाने कृतिशील योगदान दिल्यास भविष्यात आपल्याकडे ते प्रतिध्वनीसारखे चांगले फलित म्हणून परत येईल, हे निश्चित.
– डॉ. पद्मिनी पवार, प्राणिशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.