मुंबई – करोना पसरविण्यात महाराष्ट्र कॉंग्रेस जबाबदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना केले. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळाली. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागायला सांगावी, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
करोना संकटामध्ये कॉंग्रेसने मुंबईतील युपी बिहारींना गावाला जाण्यासाठी पैसे दिले आणि करोना पसरवा असे सांगितले, असा धक्कादायक आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदींच्या या वक्तव्यावरुन कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अतुल लोंढेंनी मोदींच्या वक्तव्यावरुन भाजपला चांगलेच धारेवर धरले.
महाराष्ट्राचा अपमान होऊनही भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करत आहेत. याऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेससोबत मिळून नितीन गडकरी यांच्याकडे विनंती करायला हवी होती. नितीन गडकरी यांना सांगून मोदींना माफी मागायला सांगायला हवी होती असे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राचा अपमान कॉंग्रेस खपवून घेणार नाही. त्यामुळे आम्ही नितीन गडकरींच्या घरापुढे आंदोलन केले अशी भूमिका त्यांनी मांडली.