राज्यातील मोठे उद्योग शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गुजरात मध्ये जात आहेत. हे राज्यातील जनतेला दिसत असताना; स्वत:च्या बचावासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्प गुजरात जाण्यामागे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे सांगत, तारखांचा हवाला देत आहेत.
मग, तारखां सकट प्रकल्प बाहेर जात असल्याची माहिती असताना आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे विरोधीपक्षनेते असताना फडणवीस गप्प का बसले, असा बोचरा सवाल कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर याबाबत आरोप केले, त्यावर तिवारी यांनी टिका केली.
वास्तविक पाहता, जर हे प्रकल्प राज्यातून गुजरात मध्ये जात होते तर राज्याचे विरोधीपक्ष नेते म्हणून फडणवीस गप्प का होते. आता राज्यातील जनतेच्या रोजगाराचा कळवळा त्यांना येत असून त्यावेळी हा कळवळा कुठे गेला होता ? का प्रकल्प गुजरातला जात आहेत म्हणून फडणवीस खुश होते का ? असा सवाल तिवारी यांनी केला आहे.