पिंपरी – आमचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे देशात, महाराष्ट्रात आणि शहरात कॉंग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत मोठे कार्य सुरू आहे. येणारा कालावधी कॉंग्रेससाठी उज्वल असणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष दुबळा नसून भक्कम झाला असल्याचे मत पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढारकर यांनी व्यक्त केले.
“दै. प्रभात”च्या पिंपरी कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढारकर (दि.22) शुक्रवारी आले होते. यावेळी त्यांनी “डिजीटल प्रभात”शी संवाद साधला. याप्रसंगी युवा नेते हर्षवर्धन पांढारकर, सुरेश लिंगायत उपस्थित होते.
पांढारकर पुढे म्हणाले, शहरात गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसचे चांगल्या पध्दतीने कार्य सुरू आहे. आमचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही चांगले काम केले. मात्र, 2017 च्या पालिका निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश आले नाही. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार कॉंग्रेसने उभे केले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी आराखडा, सूचना दिल्या आहेत. शहरात माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते चांगल्या पध्दतीने कामकाज करत आहेत. शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचा संपर्क असून एका विचाराने, एक दिलाने कामकाज करत आहोत. सर्व प्रभागात कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. एका जागेसाठी पाच ते सहा जण इच्छुक आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे जास्तीत-जास्त नगरसेवक महापालिकेत दिसतील, असेही ते म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे तरूणांच्या हाताला रोजगार नाही. त्यांच्या हाताला काम मिळावे, बळीराजा सुखी व्हावो, असे पांढारकर यांनी गणराया चरणी साकडे घातले.