मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सुरू झालेली चर्चा रखडल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर, जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसने लगबग सुरू केली आहे. त्यातून त्या पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई शाखेच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केली. ती भेट उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते. भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
मात्र, मुंबईतील काही विशिष्ट जागा लढवण्याचा आग्रह कॉंग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी धरल्याने पेच निर्माण झाला आहे. जागावाटपाची चर्चा प्रलंबित राहण्यामागील ते प्रमुख कारण मानले जात आहे. अशात जागावाटपावरून इंडिया आघाडीत नाराजी पसरू लागल्याचे चित्र आहे.
त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी उद्धव यांची भेट घेण्याचे महत्व वाढले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी २३ पेक्षा कमी जागा लढवणार नसल्याची ठाम भूमिका ठाकरे गटाने आधीपासूनच घेतली आहे.