तिरूअनंतपुरम – माजी मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. ॲंटनी यांचे पुत्र अनिल ॲंटनी हे केरळच्या पत्तनमथिट्टा येथून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तथापि, अनिल ॲंटनी यांचा विजय व्हायला नको, अशी भावना त्यांच्या पित्यानेच म्हणजे खुद्द ॲंटनी यांनी व्यक्त केली. दक्षिण केरळमधील या मतदारसंघात माझ्या मुलाचा पक्ष पराभूत झाला पाहिजे आणि कॉंग्रेसचे उमेदवार एंटो ॲंटनी यांचा विजय झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. (congress leader ak antony said my son anil k antony should not win the election)
राजकीय नेत्यांची मुले भारतीय जनता पार्टीत सहभागी होत आहेत हे चुकीचे आहे. मात्र कॉंग्रेस पक्ष हा माझा धर्म आहे. आताची लोकसभा निवडणूक ही करा किंवा मरा अशा स्वरूपाची आहे. भारताच्या अवधारणेचे अस्तित्व राहणार की नाही हे निर्धारित करणारी ही निवडणूक असणार आहे असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी रोज पुढे सरकते आहे आणि भारतीय जनता पार्टी पिछाडीवर जाते आहे असा दावा ॲंटनी यांनी केला. कॉंग्रेस पक्ष नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेशी सातत्याने लढतो आहे. केरळमधील सर्व २० जागांवर कॉंग्रेसच्या आघाडीच्या विजयाच्या बाजूने कल दिसतो आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत सबरीमला प्रकरणामुळे भाजपला काही मते मिळाली. मात्र यंदा त्यांचे सर्व उमेदवार तिसऱ्या स्थानावर असतील.
भाजपचा पराभव झालाच पाहिजे आणि भाजपचा उमेदवार असलेल्या आपल्या मुलाचाही पराभव झाला पाहिजे असे सांगतानाच ॲंटनी यांनी केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यावरही टीका केली. विजयन यांना कोणी गांभीर्याने घेत असेल असे आपल्याला वाटत नाही. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षच नरेंद्र मोदींच्या विरोधात लढत आहेत असे त्यांनी नमूद केले.