नवी दिल्ली – काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकार यामुळे काँग्रेससारखा जुन्या पक्षाला घरघर लागली असून आता पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी काँग्रेस नेता गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आझाद यांनी हा दावा केला. गुलाम नबी आझाद म्हणाले, मी आता काँग्रेसमध्ये नाही, त्यामुळे या मुद्द्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. ते योग्य देखील नाही.
पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान दिले होते. त्यांचे वडिलही काँग्रेसचे मोठे नेते होते. तेही माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते. त्यामुळेच त्यांचे जाणे हे पक्षाचे नुकसान आहे.
मला मिळालेल्या माहितीनुसार नजीकच्या काळात आणखी काही नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार आहेत. काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल, असेही ते म्हणाले.