उदयपूर येथे कॉंग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबिर संपन्न होईल तेव्हा त्या शिबिराची नेमकी फलनिष्पत्ती काय असेल?
जे गेल्या आठ वर्षांत घडले नाही असे या तीन दिवसांच्या चिंतन शिबिरात काय घडणार याबद्दल उत्सुकता सर्वांनाच असल्यास आश्चर्य नाही. उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड या राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. आसाममध्ये गुवाहाटी महानगरपालिकेच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तेथे विधानसभेत कॉंग्रेसकडे 29 आमदार असूनही गुवाहाटीमध्ये कॉंग्रेसला आपले खातेही उघडता येऊ नये हे कॉंग्रेसच्या पडझडीचे ज्वलंत उदाहरण.
गुजरातेत हार्दिक पटेल कॉंग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातेत पटेल आंदोलनाच्या बळावर कॉंग्रेसने भाजपला तुल्यबळ लढत दिली होती. मात्र, आता गुजरातेत कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे आणि हार्दिक पटेल कार्याध्यक्ष असूनही निर्णय प्रक्रियेत आपल्याला स्थान नसल्याची तक्रार करीत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कॉंग्रेसला फारसे मानाचे स्थान नाही. पश्चिम बंगालसारख्या राज्यांत कॉंग्रेसचा जनाधार आक्रसला आहे. राजस्थानात चिंतन शिबिराच्या बाहेर सचिन पायलट यांचे लावण्यात आलेले फलक काढून टाकण्यात आले. तेव्हा राजस्थानात देखील पक्षांतर्गत कुरबुरी लपलेल्या नाहीत. अशा संभ्रमाच्या अवस्थेत असणाऱ्या कॉंग्रेसकडून चिंतन शिबिरात नक्की कसले चिंतन होते आणि त्या चिंतनाचे दृश्य स्वरूप म्हणून संघटनेत काय बदल झालेले दिसतात हा खरा कळीचा मुद्दा आहे.
कॉंग्रेसचा पराभव झाला तरी कॉंग्रेसचा जनाधार कायम आहे असे कॉंग्रेसचे समर्थक सांगतात. कॉंग्रेसच्या मतांचे प्रमाण 20 टक्क्यांपाशी आहे आणि ते फारसे निराशाजनक नाही, असाही दावा करण्यात येतो. त्यात तथ्य असेलही. पण संसदीय लोकशाही रचनेत अखेरीस संसद किंवा विधिमंडळात जागा किती जिंकल्या यालाच महत्त्व असते. कारण, सत्ताप्राप्तीचा तोच आधार असतो. लोकसभा निवडणुकीत पन्नासचा आकडा गाठताना कॉंग्रेसची दमछाक झाली होती हे विसरून चालणार नाही. तेव्हा जागा जिंकल्या नसल्या तरी मतांचे प्रमाण कायम आहे असे लटके समाधान करून घेण्यात धन्यता मानली, तर कॉंग्रेसला चिंतनाची आवश्यकता नाही.
लोकसभा निवडणुका आता दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी या वर्षाअखेरीस गुजरातसह काही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सगळ्याची तयारी सुरू करायची तर उशीरच झाला आहे, असे म्हटले पाहिजे. याचे कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेसने तातडीने आत्मपरीक्षण आणि चिंतन करण्याची गरज होती. मात्र, पुनःपुन्हा पराभवाचे धनी होत राहण्यात कॉंग्रेस मश्गुल राहिली. प्रशांत किशोर यांना व्यूहनीती तयार करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले; पण किशोर यांच्या बहुधा अवाजवी मागण्यांमुळे ती योजना फिस्कटली आणि आता किशोर समाजमाध्यमांवरून कॉंग्रेसला टोले देत असतात. पण प्रश्न तो नाही. कॉंग्रेससमोर आव्हान असल्या टोलेबाजीला उत्तरे देत बसण्यापेक्षा गंभीर संकटांना सामोरे जायचे आहे.
त्यातील पहिली समस्या म्हणजे आपला घसरता आलेख. तो कसा सावरायचा यावर कॉंग्रेसला चिंतन करणे निकडीचे. पण दुसरा प्रश्न याहून गहन. आणि तो म्हणजे आपला मतदारवर्ग अन्य विरोधी पक्षांकडे वळू लागला आहे त्याची दिशा कशी बदलायची. सुरत महानगरपालिकेत कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नव्हती आणि आम आदमी पक्षाने कॉंग्रेसची जागा भरून काढली. गुवाहाटी महानगरपालिकेत भाजपने दणदणीत बहुमत मिळविले; पण ज्या दोन जागा विरोधकांना मिळाल्या त्या अल्पसंख्याकांचे बाहुल्य असूनही एक आप आणि दुसरी जातीय आसाम परिषदेने जिंकली.
पंजाबमध्ये तर कॉंग्रेसला पुरते नामोहरम करून आपने सत्ता खेचून आणली. तेव्हा संघटनात्मक बदल केले नाहीत, अहंकार बाजूला ठेवून समविचारी पक्षांशी आघाड्या केल्या नाहीत, व्यूहनीतीत परिवर्तन केले नाही, तर भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असणारे स्थानही कॉंग्रेस गमावून बसेल. कॉंग्रेसऐवजी मतदारांचा कल अन्य भाजपविरोधी पक्षांकडे वळत आहे याचाच अर्थ मतदार कॉंग्रेसला पर्याय शोधू लागले आहेत असा होतो आणि असे तेव्हाच होते जेव्हा मतदारांचा पूर्ण भ्रमनिरास होतो.
हा भ्रमनिरास कमी करायचा तर कॉंग्रेसला मूलभूत बदल करावे लागतील. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून त्यांना गळ घालण्याची औपचारिकता चिंतन शिबिरात झाली तर ते चिंतन नसून ती केवळ आत्मवंचना ठरेल. याचे कारण स्वतः राहुल गांधी यांनी कॉंग्रेसला लढाऊ नेतृत्व देण्याचा कोणताही बाणा दाखविलेला नाही. पराभवानंतर देखील पक्षात चैतन्य टिकवून ठेवणे सोपे नाही आणि सततच्या पराभवानंतर तर ते आणखीच कठीण होते. मात्र, कसलेले नेतृत्व एक तर पक्षाला त्या परिस्थितीही आपले चैतन्य हरवू देत नाही किंवा सरळ पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बाजूला होते. यापैकी काहीही न करता केवळ पक्षांतर्गत सूचना देणाऱ्यांना आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांना लाखोल्या वाहून प्रश्न सुटणार तर नाहीच, तो आणखी जटिल होईल. किंबहुना तसा तो झालाच आहे. तेव्हा देशव्यापी प्रभावी पक्ष हे आपले गतवैभव प्राप्त करायचे तर त्यासाठी उत्साही नेतृत्वाचा उपयोग होणार नाही. नव्या पिढीला कॉंग्रेसमध्ये आपले काही भवितव्य आहे असा विश्वास वाटायला हवा, असे पक्षाचे धोरण हवे.
भाजपवर शरसंधान करण्यात धन्यता मानण्यात आली तरी ती काही चिंतन शिबिराची फलनिष्पत्ती नव्हे कारण त्यासाठी अन्य व्यासपीठे आहेत. तेव्हा कॉंग्रेससमोर ज्याविषयी चिंतन करावे अशा अनेक बाबी आहेत; पण त्यातील प्राधान्याचे मुद्दे हे आपले अस्तित्व कसे टिकवावे, वर्तमान कसे सुधारावे आणि भवितव्य कसे साकारावे हे आहेत. चार भिंतींच्या आड केलेल्या चर्चा म्हणजे चिंतन हे खरे; पण त्याचे दृश्य परिणाम मैदानातच दिसावे लागतात.
चिंतन शिबिरानंतर कॉंग्रेसमध्ये मुदलात परिवर्तन होते का आणि झालेच तर कुठल्या स्तरावर होते हे पाहणे औत्सुक्याचे. ठराव आणि नेतृत्वावर विश्वास याने चिंतन शिबिराची वेळ मारून नेता येईल; पण मतदारांना पक्षाबद्दल विश्वास पुन्हा वाटावा असे वातावरण निर्माण करायचे असेल तर कॉंग्रेसला चिंतन आणि त्यानंतर शस्त्रक्रियेची गरज आहे. तेव्हा ही शास्त्रकिया कशी आणि लवकरात लवकर कधी करायची हाच खरे तर कॉंग्रेसच्या चिंतनाचा एकमेव विषय हवा. कॉंग्रेसने आठ आणि किमान गेल्या तीन वर्षांचा वेळ फुकट घालविला आहेच; आता कॉंग्रेसकडे कालावधी अल्प आहे.
जुना पक्ष ही बिरुदावली तेव्हाच शोभून दिसते जेव्हा पक्षात चैतन्य आणि उभारी असते. एरव्ही जुन्यापेक्षा जीर्ण हे विशेषण अधिक चपखल बसते. कॉंग्रेसला जीर्णता वगळून जुनेपण मिरवायचे असेल तर नावीन्यपूर्ण काही करण्यावाचून गत्यंतर नाही. कॉंग्रेस ज्या चिंताजनक वळणावर आहे तेथे मलमपट्टी करणारे चिंतन उपयोगाचे ठरणार नाही. चिंतन शिबिराकडून नावीन्याची अपेक्षा आहे.