नागपूर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने पाच वर्ष पदावर झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, असा ठराव अलीकडेच झालेल्या चिंतन शिबिरात संमत केला आहे. या ठरावाला अनुसरून पक्षाच्या नागपूर शहर प्रमुख आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कॉंग्रेसचे नागपूर शहरप्रमुख विकास ठाकरे आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सादर केला आहे. माजी राज्यमंत्री असलेले मुळक यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पक्षाच्या सुमारे 17 ते 18 जिल्हाध्यक्षांनी, ज्यांनी पदावर पाच वर्षांहून अधिक काळ पूर्ण केला आहे, अशांनी राजीनामे दिले आहेत आणि हीच प्रक्रिया देशभरात सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे प्रदेश कॉंग्रेसने आयोजित केलेल्या पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समितीने तयार केलेला हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.