बंगळुरू – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता कर्नाटकात पोहोचली असून कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीही आज यात्रेत सहभागी झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र, भारत जोडोचा काहीही परिणाम कर्नाटकात होणार नाही, असा दावा भाजप नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे.
भारत जोडोच्या धास्तीमुळेच भाजप आपल्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या मेळाव्यांच्या आयोजनाची आणि राज्यव्यापी दौऱ्यांची तयारी करत असल्याचा दावा करण्यात आला होता. तोही बोम्मई यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, ही तयारी अगोदरपासूनच सुरू होती.
राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वड्रा अशा सगळ्याच नेत्यांना आपल्या पक्षाचे काम करण्याचा अधिकार आहे. सोनिया गांधी आल्या. त्यांनी अर्धा किलोमिटर पदयात्रा केली आणि त्या निघून गेल्या. आमच्याबाबत बोलायचे झाले तर या सगळ्याशी आमचे काही देणेघेणे नाही व त्याचा आमच्यावर काही परिणामही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, भाजपने राज्यात सहा रॅलींचे अगोदरच आयोजन केले आहे. मात्र विधानसभेचे सत्र असल्यामुळे हे मेळावे दसऱ्यानंतर घेण्याचा निर्णय आम्ही पूर्वीच घेतला होता. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी तुम्ही दिल्लीला जाणार असल्याची चर्चा असल्याचे बोम्मई यांना विचारल्यावर जाण्याच्या अगोदर मी माध्यमांना तसे सांगेन, असे उत्तर त्यांनी दिले.