मुंबई – महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की महाविकास आघाडीसोबत याबद्दल कॉंग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण दिसत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पालिका निवडणूक महाविकास आघाडीत लढण्याची तयारी दर्शवली आहे, तर मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी मात्र स्वबळाचा सूर लावला आहे.
आम्ही बीएमसी इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. समाधानकारक जाग् मिळाल्या तर आमची आघाडी राहील, पण आघाडीत निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता आहे अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत जर कोणी म्हणत असेल, तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असंही एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढेल, शिवसेनेसोबत युती करण्याची काहीही गरज नाही, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केलं होतं. याचं कारण म्हणजे कॉंग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी शिवसेनेबद्दल नाराजीही आहे.
आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी रवी राजा यांनी याआधीही बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीसह इतर समिती निवडणुकात कॉंग्रेस सत्ताधारी सेनेविरोधात मैदानातही उतरली होती. मात्र ऐनवेळी कॉंग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.
थोरातांकडून महाविकास आघाडीचे संकेत
मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते. लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी आजच केला होता. त्यानंतर रवि राजांनी परस्पर विरोधी मत मांडत गोंधळ उडवला. एकाच दिवसात तीन नेत्यांची वेगवेगळी मते दिसल्याने पक्षात गोंधळ असल्याचं बोललं जात आहे.
2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच शड्डू ठोकला आहे. भाजपने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे इतर चार प्रमुख पक्ष कसे रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल शिवसेना 92
भाजप 82
कॉंग्रेस 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस 9
समाजवादी पक्ष 6
एमआयएम 2
मनसे 1
अभासे 1