हिमांशू
लाटा येतात… जातात! निवडणुका येतात.. जातात. विजय नम्रपणे आणि पराभव खिलाडूपणे पत्करणे ज्याला जमले, तो राजकारणात टिकला. अपवाद वगळता यावेळी अनेकांनी आपला पराभव खिलाडूपणे स्वीकारला आहे. खरे तर ही निवडणूक इतकी एकतर्फी होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. कदाचित सत्ताधाऱ्यांनाही! पण लोक चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स बघतात, हे मात्र या निवडणुकीने दाखवून दिले. 2014 प्रमाणे यावर्षी कोणतीही लाट नाही, हे सगळ्यांनीच मान्य केले होते. काही जण “अंडरकरंट’ वगैरे शब्द हळूच वापरत होते; पण त्यातही जोर नव्हता. जोर होता तो प्रचारात. तो मात्र सगळ्यांनीच लावला होता. मुद्दा एवढाच की प्रचारात मुद्दाच नव्हता.
असो! हल्ली मतदारसुद्धा “आम्ही मुद्द्यांवर मतदान करत नाही,’ असे सरळसरळ सांगायला शिकलेत. हा आमचा नव्हे तर
सर्वेक्षण करणाऱ्यांचा अनुभव आहे. एका ऑनलाइन न्यूज पोर्टलवरून हा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. जो नेता लोकांसमोर कॉन्फिडन्स दाखवतो, तो लोकांना आपला वाटतो. कितीही हल्ले झाले, तरी हा कॉन्फिडन्स गमवायचा नाही, हे तत्त्व पाळावे लागते. विरोधकांना चेहऱ्यावरचे टेन्शन लपवणे बऱ्याच वेळा अवघड जात होते, हे निरीक्षण मात्र आमचे. अनेकजण कृत्रिमरीत्या नॉर्मल असल्याचा आव आणत होते. अर्थात, 2014 पेक्षा ही निवडणूक घासून होईल, या शक्यतेमुळे थोडाफार कॉन्फिडन्स सगळ्यांना होताच.
परंतु सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आम्हाला दिसला, तो आंध्र प्रदेशातले चंद्राबाबू नायडू यांच्या चेहऱ्यावर. मतदानाच्या तीन-चार फेऱ्या झाल्यानंतर हे महाशय सर्वप्रथम शरद पवारांसोबत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राच्या विरोधात पत्रकार परिषदेत दिसले. आंध्र प्रदेशमध्ये (पूर्वीच्या) आयटी हब वगैरे त्यांनीच सुरू केलेले. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे ईव्हीएमसंबंधी तांत्रिक माहिती असेल, असे आम्हाला उगीचच वाटले होते. परंतु त्यांनीही वरवरचीच माहिती दिली. रशियातून ही यंत्रे “कन्ट्रोल’ केली जातायत, अशी मौलिक माहिती चंद्राबाबू आणि पवारांनी दिली होती. चंद्राबाबूंचा कॉन्फिडन्स त्यांना धोका देणारा ठरलाय.
निवडणुकीचे सगळे टप्पे पूर्ण झाल्याबरोबर चंद्राबाबूंनी घर सोडले. सगळ्या राज्यांमधल्या नेत्यांना भेटले. नरेंद्र मोदींच्या विरोधात कशी व्यूहरचना करायची आणि आपण सगळ्यांनी कसे एकत्र राहिले पाहिजे, हे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितले. त्यांचे असे झंझावाती दौरे सुरू असताना त्यांच्या घरात, आंध्र प्रदेशात काय चाललंय, याचाच त्यांना अंदाज आला नाही. तिथे त्यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमचा असा काही धुव्वा उडवला, की चंद्राबाबूंचे अवसानच गळाले.
मतदान झाल्यावर सामान्यतः राजकीय पक्ष आपापल्या संभाव्य कामगिरीचा आढावा घेतात. चंद्राबाबूंना कदाचित तो घ्यायला फुरसतच मिळाली नसेल. आपला पक्ष निवडून आल्यावर पुढे काय-काय करायचे हे ठरवण्याच्या प्रयत्नांत त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवली. आपला आत्मविश्वास कॅमेऱ्यांपुढे आणला. परंतु आंध्र प्रदेशातले निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्राबाबू दिसेनासे झाले. यापूर्वी 2004 मध्ये चंद्राबाबूंनी ही परिस्थिती अनुभवली होती. तरीसुद्धा इतका कॉन्फिडन्स ही माणसे आणतात कुठून, हेच कळत नाही.