छत्रपती शिवरायांनी जिंकलेल्या लढाया या “मिलिट्री एज्युकेशन’चा भाग : लष्करप्रमुख
पुणे – “पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी शेकडो किलोमीटरचे अंतर, मोठ्या नद्यांचे खोरे काही काळात पार करणे, कमी वेळात स्वारी करणे अशा अशक्यप्राय गोष्टी करून दाखवल्या. त्याकाळात युद्धासाठी “मॉडर्न टेक्नॉलॉजी’ उपलब्ध नव्हती, मात्र तरीही आपल्या हुशारीच्या बळावर त्यांनी युद्ध जिंकली. मात्र, यातील बहुतांश लढायांचा इतिहास हा वरवर माहितीवर आधारित आहे. युद्धांबाबतची ठोस माहिती समोर येणे गरजेचे आहे,’ अशी अपेक्षा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली.
मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) लिखित “या सम हा’ पुस्तकाचे प्रकाशन जनरल नरवणे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी एयर चीफ मार्शल पी. व्ही. नाइक (निवृत्त), लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त), सामरिक शास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीकांत परांजपे, अनिल हर्डिकर उपस्थित होते.
जनरल नरवणे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी गमिनी काव्याचा वापर करत डोंगरदऱ्यांमध्ये कठीण परिस्थितीत युद्ध जिंकले. तर, बाजीराव पेशव्यांनी दख्खन पठारावर युद्धनीतीचा प्रभावी वापर करत आपले साम्राज्य उभे केले. ही दोन्ही व्यक्तिमत्त्व महान आहेत. त्यांनी जिंकलेल्या लढाया हा एकप्रकारे “मिलिट्री एज्युकेशन’चा भाग आहे.
त्याकाळात युद्धासाठी “मॉडर्न टेक्नॉलॉजी’ उपलब्ध नव्हती. मात्र, तरीही आपल्या हुशारीच्या बळावर त्यांनी युद्ध जिंकली. त्यांनी कोणताही अभ्यास न करता प्रभावीपणे युद्धनीतीचा वापर केला. त्यामुळे ते “सोल्जर्स जनरल’ होते. मात्र, प्रत्यक्षात लढायांमध्ये काय झाले, कोणती युद्धनीती वापरली गेली, लढाई कशी झाली, नेतृत्व कोणी केले अशा अनेक गोष्टींची माहिती नसते. या परिस्थितीत युद्धांबाबातची ठोस माहिती समोर येणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत पित्रे यांनी लिहिलेले “या सम हा’ पुस्तक हे मार्गदर्शक ठरणार आहे,’ असेही नरवणे म्हणाले.