मंचर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 दिवसात संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवतो व त्यांना आय. टी. महामंडळ मार्फत निर्णय देऊ असे सांगितले; परंतु 8 महिने झाले तरी मुख्यमंत्री यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप आंबेगाव तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षा सुशिला टोके यांनी केला.
आंबेगाव तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती आंबेगाव येथील घोडेगाव कार्यालयात बुधवारी (दि. 28) धरणे आंदोलन करुन विविध प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी केली. आंदोलनात आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भाषणातून शासनाविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेली आठ वर्षे हे संगणक परिचालक कमी पगारात ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत. त्यांना अजून त्यांच्या कामाप्रमाणे मोबदला मिळत नाही. शासन त्यांची पद निर्मिती करत नाही. आजपर्यंत आझाद मैदान, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी अनेक आंदोलने केली.
शासनाने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी टाळाटाळ केली. संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे काम ठप्प झाले आहे. असे सचिव देविदास घोडेकर, संदिप आळेकर यांनी सांगितले. नागरिकांना ऑनलाइन दाखले मिळत नाहीत. ग्रामपंचायतींचे दप्तर ऑनलाइन होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचे कामही ठप्प झाले आहे.
संगणक परिचालक गावपातळीवर तळागळातील नागरिकांना सेवा देण्याचे काम करत आहेत. डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये संगणक परिचालकांचा मोलाचा वाटा आहे; परंतु शासन यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहिती उपाध्यक्ष शाहरुख पटेल यांनी दिली. आंदोलनामुळे शासकीय कामे ठप्प झालेली आहेत तरी शासनाने संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करुन त्यांना आय. टी. महामंडळामध्ये सामावून घ्यावे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.