नवी दिल्ली – भारतात कोविड लसीकरण मोहीम सुरू होऊन आज एक वर्ष पुर्ण झाले. या अवधीत देशात कोविडचे एकूण 156 कोटी 70 लाख डोस दिले गेले आहेत. कोविड लसींचे दोन्ही डोस पुर्ण केलेल्या नागरीकांची संख्या 68 टक्के इतकी आहे.
कोविड लसीकरणाला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने सरकारने एक विशेष टपाल तिकीटही जारी केले आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारीला कोविड लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले गेले. त्यानंतर 2 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर 1 मार्च पासून 60 वर्ष वयाच्या पुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.त्याच्या महिनाभराच्या अवधीनंतर म्हणजे 1 एप्रिल पासून 45 वर्षांच्या पुढील नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले.
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले. 100 कोटी डोसचा टप्पा 21 ऑक्टोबर रोजी पुर्ण केला गेला. तर 7 जानेवारी रोजी 150 कोटी डोसचा टप्पा पुर्ण केला गेला. देशात सध्या 15 ते 18 वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाचे काम सुरू आहे.