नवी दिल्ली – भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याचा निर्णय शनिवारी (दि. 15) जाहीर करत विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्वही काढून घेतले होते. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर कोहलीने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय ट्विटरवरून (दि. 15)जाहीर केला.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
येत्या काळात कोहली हा निर्णय घेणार हे अपेक्षितच होते. तरीही या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट व त्यातील राजकारण ढवळून निघणार याचेही संकेत मिळाले आहेत.
गेल्या काही काळापासून कोहली व बीसीसीआय यांच्यात सातत्याने वाद सुरू होते. तसेच कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याविरोधात मत व्यक्त करत एका पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप केले होते. तेव्हापासून कोहली बीसीसीआयच्या रडारवर होता.
संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्षे मेहनत घेतली. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेने करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचाराने मी काम केले. पण जर त्याच क्षमतेने मी एखादी गोष्ट करू शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळे करणे भाग आहे. अर्थात असे करणे योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे, पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करू शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे, असे आपल्या ट्विटमध्ये कोहलीने म्हटले आहे.
भारतीय संघात दुही?
कोहलीकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेतले गेल्यावर भारतीय संघात दुही असल्याचे बोलले जात होते. मात्र, अधिकृतरित्या कोणी बोलले नसले तरीही कोहली व रोहित शर्मा असे दोन गट संघात तयार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे खेळाडूंवरही प्रचंड दडपण होते. कसोटीचे नेतृत्व कोहलीकडे असल्याने रोहितने दुखापतीचे कारण सांगितले, तर रोहितच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिका खेळायची नसल्याने या मालिकेतून कोहली माघार घेणार असे चित्र निर्माण झाले होते. आता येत्या काळात भारतीय संघात तसेच कोहलीबाबत काय घडत आहे हे स्पष्ट होणार आहे.
बीसीसीआयचेही आभार मानले
आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असे मत कोहलीने व्यक्त केले. महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडल्यावर त्यांनी मला संधी दिली. देशाचे नेतृत्त्व करण्याचे भाग्य मला लाभले. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवी शास्त्री व मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या सर्वांचे माझ्या यशात योगदान आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.