सातारा – लॉकडाऊनमुळे गोरगरीब आणि रोजंदारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले माजगावकर माळ झोपडपट्टीतील गोरगरिबांच्या मदतीला धावून आले. त्यांनी दिलेली अन्नधान्याची पॅकेट्स कार्यकर्त्यांनी झोपडपट्टीतील प्रत्येक घरात पोहोचवली. त्यामुळे या गरजू लोकांचा पुढील पंधरा दिवसांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे.
करोनाच्या संकटामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. देशभरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांची आणि गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना आ. शिवेंद्रराजे यांनी मदतीचा हात दिला आहे. भाजपच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आ. शिवेंद्रराजे यांनी सोमवारी (दि. 6) नामदेववाडी झोपडपट्टीतील शेकडो लोकांना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य स्वखर्चाने दिले होते. त्यानंतर माजगावकर माळ झोपडपट्टीत बुधवारी त्यांच्यामार्फत किमान पंधरा दिवस पुरतील एवढी गहू, तांदूळ, साखर आणि तेल असलेली पॅकेट्स देण्यात आली.
कार्यकर्ते सचिन कांबळे, रवी बाबर, पंकज माने, अमोल जानराव, अजय बाबर, नाना पिसाळ, सुनील गायकवाड, शंकर पाटील, निखिल गायकवाड, अजय कांबळे, सुरेश अडागळे, सूरज आवारे, आदिल शेख, बापू भोरे यांनी ही पॅकेटस् घरोघरी दिली. या मदतीमुळे झोपडपट्टीतील लोकांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. प्रत्येकाने घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे.