रामराजेंनी दिला एकजुटीचा सल्ला, विजयराव कणसे यांना आघाडी धर्माची आठवण राष्ट्रवादी भवनात
सातारा – राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे साताऱ्यात शनिवारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “थिंक टॅक’ राष्ट्रवादी भवनात एकत्र आला. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात महाविकास आघाडीच्या आगामी एकत्रित राजकारणाची झलक पाहयला मिळाली. “परस्परांविषयी स्नेहभाव ठेवल्यानेच राजकीय मतभिन्नता असली तरी जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचा वैचारिक एकसूत्रीपणा विकासासाठी उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहिले पाहिजे,’ असा ज्येष्ठत्वाचा सल्ला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
रामराजे म्हणाले, “”बाळासाहेब पाटील अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रवादीची सातारा जिल्ह्यात ताकद कशी अबाधित आहे, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. शरद पवार यांच्या विचारांची सातारा जिल्हा पाठराखण करतो, हे राजकीय कारण आहे. मात्र, एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ न करण्याने लोकप्रतिनिधी परस्परांविषयी स्नेह बाळगून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सातारा जिल्हयात ताकद आहे.” तीन पक्षांचं सरकार राज्यात टिकणार का, या सामान्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची जवाबदारी आपली आहे, असे सांगून रामराजे यांनी जिल्हयात गटातटाची भांडणे बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. राजकीय स्थैर्य हे सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य असून बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाअंतर्गत हे स्थैर्य टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
बाळासाहेब साधा सरळ माणूस : मकरंद पाटील
आमदार मकरंद पाटील यांनी भाषणात बऱ्याच राजकीय कोट्या केल्या. ते म्हणाले “”बाळासाहेब पाटील साधा सरळ माणूस, कोणाच्या अध्यात ना मध्यात. कोणाच्या भानगडीत पडत नाहीत, कोणाला अंगाला लावून घेत नाही. मात्र, आता त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. त्यांना असे वागून चालणार नाही.” बाळासाहेबांच्या पार्च टर्म झाल्याने त्यांचा मंत्रिपदाचा मान नैसर्गिक आहे. त्यात माझी कोणतीही नाराजी नाही. उलट मला आनंदच असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले.
आघाडी धर्म पाळू या ः कणसे
कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे तब्बल दोन दशकानंतर बाळासाहेबांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी भवनामध्ये आले. जिल्ह्यापुढे अनेक समस्या असताना प्रशासनाचा बेफिकिर कारभार सुरू असल्याची तोफ त्यांनी डागली. कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात काम करताना आघाडी धर्म पाळून सर्वांना समान न्याय द्यावा, तसेच प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी त्यांनी केली. प्रभाकर देशमुख, आमदार दीपक चव्हाण यांचीही भाषणे झाली.
अधिकाऱ्यांना मस्ती ः नरेंद्र पाटील
भाजपच्या नेत्यांनी प्रशासनाच्या आडोशाने प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यामुळे प्रशासनातले अधिकारी कोणालाच जुमानत नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. बळीराजाला न्याय व कार्यकर्त्यांना प्रतिष्ठेची वागणूक मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.