लासुर्णे येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
लासुर्णे – सध्याच्या राज्य सरकारने घोषित केलेली शेतकरी कर्जमाफी योजनाचा फायदा ऊस व फळबाग उत्पादन शेतकऱ्यांना होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. लासुर्णे (ता. इंदापूर) येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला होता. परंतु घटक पक्षाने दगा दिला आहे. देशातील 13 राज्यात भाजपसह समविचारी पक्षाचे सरकार आहे. सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, असे सांगितले होते.
परंतु या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा ऊस व फळबाग उत्पादक लोकांना फायदा होणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी प्रत्येक वर्षी पीक कर्ज घेतो. उसाच्या बिलातून रक्कम जात असल्याने कर्ज थकीत राहत नसल्यामुळे कर्जमाफी फायदा होणार नाही. त्यामुळे या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचे टीकास्त्र पाटील यांनी सोडले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, बाबासाहेब चवरे, तुकाराम काळे, रामभाऊ पाटील, अशोक वणवे, माऊली चवरे, नाना शेंडे, शहाजी शिंदे, आकाश कांबळे, अतुल तेरखेडकर, रणजीत पाटील, डॉ. विकास शहा, अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.