पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सर्व सहकारी बँका, संस्था आपल्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात भरारी घेतील; सहकार क्षेत्राला आणखी सक्षम करण्यासाठी भगिनी निवेदिता सहकारी बँकेने सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले पाहिजे, असे प्रतिपादन सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केले.
भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ टिळक स्मारक मंदिरात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनास्कर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, बँकेच्या अध्यक्ष सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा सीएमए डॉ. नेत्रा आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण भरारी स्मरणिकेच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन आणि बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.
भगिनी निवेदिता बँकेने खातेदारांचा विश्वासाचा ठेवा मिळवला आहे. राजकारणापासून भगिनी निवेदिता बँकेने अलिप्त राहून सहकार क्षेत्रात विकास केला आहे. महिलांनी महिलांच्या क्षमीकरणासाठी ही बँक चालवली आहे, हे कौतुकास्पद आहे, असे अनास्कर यांनी नमूद केले. दरम्यान, सहकार संस्था आणि बँकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे, अशी अपेक्षाही अनास्कर यांनी व्यक्त केली.
बॅंकेने सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलांना सहकार क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. भगिनी निवेदिता यांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या विचारांशी आपण एकरूप आहोत. ही एकरूपता आपण टिकवून ठेवली आहे. बॅंकेने सहकार क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे. आज काळ झपाट्याने बदलत आहे काळानुसार बँकेने बदल करून ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे, असे प्रा. जोशी म्हणाले.
बँकेच्या वर्षभरातील कार्याचा डॉ. पैठणकर यांनी प्रास्ताविकातून आढावा घेतला. ग्राहकांच्या संवादाबरोबर ठेवी आणि आकर्षक योजना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ५० वर्षे पूर्ण झाली असून ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. बॅंकेची विश्वासाची परंपरा आहे.
बॅंकेने काळानुरूप ग्राहकांना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या आहेत. शिक्षण कर्ज योजनासह विविध योजना सादर केल्या आहेत, अशी माहिती डॉ. पैठणकर यांनी दिली. सूत्रसंचालन स्मिता देशपांडे यांनी केले, नेत्रा आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर गायिका सावनी रवींद्र यांचा “हिंदी-मराठी’ गीतांचा कार्यक्रम झाला.