नगर -राज्यातील मंदिरे उघण्यासाठी खुद्द राज्यपालांनाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते, यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असावे, असा सवाल करत माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रीयेवर टीका केली.
राज्यातील धार्मिकस्थळे बंद ठेवणे, ही राज्य सरकारची विकृतीच आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. एका खासगी कार्यक्रमानिमित्त नगरला आलेल्या माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेले नाही. कोणाचेच कोणावर नियंत्रण राहिलेले नसल्याने सरकार वाचवण्यात सर्व मग्न आहेत. जनतेच्या प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजपाने राज्यात आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्न मांडत आहे. दिलीप गांधी यांचे सारखे मतदारसंघाचा विकास करणारे व्यक्तिमत्व संसदेत पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
सरोज गांधी, देवेंद्र गांधी, अनिल डागा, रोषन गांधी, सागर गोरे, लक्ष्मण बोठे आदी यावेळी उपस्थित होते. दिलीप गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. पाटील यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. राज्य सरकार धार्मिकस्थळांच्या प्रश्नावर अपयशी ठरल्याची भावना गांधी यांनीही व्यक्त केली.