मुंबई – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते भाजप कार्यकर्त्यांना सल्ला देताना बोलत आहेत की, “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा.”
भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या अभियानाची कार्यशाळा घेतली. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची, यासंबंधी बोलताना धक्कादायक सल्ला दिला.
काय म्हणाले होते बावनकुळे –
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतके चांगले काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचे. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे.
वक्तव्याचा राज्यभरातील पत्रकारांकडून निषेध –
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. बावनकुळे यांचे हे वक्तव्य ऐकून राज्यभरातील पत्रकारांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध नोंदवण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर दौरा आहे. यावेळी त्यांना कोल्हापुरी पायतान देऊन निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे प्रेस क्लबच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतरही ठिकाणाहून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, विविध पत्रकार संघटनांकडून त्यांच्या चहापाण्याच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण –
मी ते असेच बोललो. मी त्यांना बोललो की बाबा रे, आपण एवढे चांगले काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढे चांगले काम केले आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांबरोबर बसा, त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना खरी वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगले वागा. या पद्धतीचा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला. याच्यात काही वाईट नव्हते.