नवी दिल्ली : हिंदू धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे कालिचरण महाराज नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. कालिचरण यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी देशाला जर आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर आपण केवळ हिंदूंनाच मत देऊन निवडून आणावे असे म्हटले आहे.
अलिगढमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच सर्व हिंदूंनी धर्माचाच आधारावर मतदान केले पाहिजे असे म्हटले. एवढेच नाही तर त्यांनी भारतात केवळ सनातन धर्म असून बाकी कोणताही धर्म देशात नसल्याचेही म्हटले आहे.
राजकारणाविषयी बोलताना त्यांनी जनतेने राजकारणाचा तिरस्कार करणं सोडलं पाहिजे कारण राजकारणामुळेच हिंदू राष्ट्राची निर्मिती शक्य असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. त्यांनी इराण, इराक अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या सारख्या देशांचा उल्लेख करत त्यांनी हे सर्व देश आपल्या हातून निघून गेले आणि कट्टर मुस्लिम राष्ट्र बनले असल्याचे कालिचरण यांनी म्हटले.
हे तेच कालिचरण महाराज आहेत जयंती महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दखल होऊन त्यांना अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, आता कालिचरण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.