नवी दिल्ली: गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात भारत कमकुवत केला म्हणूनच चीनचे भारतावर अतिक्रमण करण्याचे धाडस झाले अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली आहे.
आज एका ट्विटर संदेशात त्यांनी सुमारे साडे तीन मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसारीत करून मोदी सरकारमुळे देश कसा कमकुवत झाला याचा सारा तपशीलही ऐकवला आहे.
त्यांनी म्हटले आहे की विदेश नीती, आर्थिक क्षमता आणि शेजारील देशांशी असलेले संबंध या बाबतीत भारताचे गेल्या सहा वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे.
आज जगातील कोणत्याही देशाशी भारताचे सुदृढ संबंध राहिलेले नाहीत जे काही संबंध आहेत ते केवळ व्यापारी पातळीवरचेच आहेत. आपले रशियाबरोबरचे संबंध बिघडले आहेत. युरोपिय देशांबरोबरही भारताचे पूर्वी इतके चांगले संबंध राहिलेले नाहीत.
पूर्वी आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानशिवाय नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांशी आपले चांगले संबंध होते. पण हे संबंध आता चांगले नाहीत. आपण विदेशातील अनेक देशांशी आणि शेजारील देशांशी संबंध बिघडवून बसलो आहोत.
भारत गेल्या सहा वर्षात आर्थिकदृष्ट्याही अत्यंत दुबळा झाला असून देशाची बेरोजगारी आणि एकूणच अर्थव्यवस्था बिघडली आहे. सर्वच बाजुने भारत कमकुवत झाल्याचे लक्षात
आल्यामुळेच चीनने आपल्या विरोधात आक्रमण करण्याचे धाडस केले आहे असा आरोपही त्यांनी केला.