सॅन फ्रान्सिस्को – “चीनने आपल्या स्थापनेपासून एक इंचही परदेशी भूमी काबीज केलेली नाही. तसेच आजपर्यंत चीनमुळे युद्ध सुरू झालेले नाही,’ असा कांगावा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी अमेरिकेतील आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या (एपीइसी) शिखर परिषदेत केला. ते अमेरिका-चीन बिझनेस कौन्सिलच्या डिनरमध्ये बोलत होते.
जिनपिंग पुढे म्हणाले, चीन विकासाच्या कोणत्याही स्तरावर पोहोचला तरी आम्ही कुठेही कब्जा करण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही आमची इच्छा इतरांवर कधीही लादणार नाही. चीनला आपला प्रभाव वाढवायचा नाही आणि आम्ही कोणाशीही युद्ध करणार नाही. तसेच, अमेरिका-चीन संबंधांबद्दल बोलताना शी म्हणाले, जगाला चीन आणि अमेरिकेने एकत्र काम करण्याची गरज आहे.
आम्हाला धोका म्हणून पाहिले जाऊ नये. स्वतःच्या फायद्यासाठी आणि चीनच्या नुकसानासाठी काम करणे चुकीचे आहे. जगात कितीही बदल झाले तरी अमेरिका आणि चीनमधील शांततापूर्ण संबंध कधीही बदलणार नाहीत, अशी ग्वाही देखील जिनपिंग यांनी यावेळी देण्याचा प्रयत्न केला.
चीन कधीही अमेरिकेच्या विरोधात काम करत नाही. आमचा उद्देश अमेरिकेला आव्हान देणे किंवा बदलणे हे नाही. आत्मविश्वासपूर्ण आणि सतत प्रगती करत असलेली अमेरिका पाहून आम्हाला खूप आनंद होईल. तसेच अमेरिकेनेही चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये. आपण सर्वांनी मिळून शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध चीनचे स्वागत केले पाहिजे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
“एलएसी’वर कब्जा करण्याचा प्रयत्न
2020 मधील गलवान संघर्षानंतर, चीन एलएसीवरील सद्यस्थिती बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे. तो “एलएसी’च्या या बाजूच्या भारताचा भाग स्वतःचा असल्याचा दावा करतो. त्यामुळे, दोन्ही बाजूंनी पेट्रोलिंग पॉईंट 15 वर सैन्याची तैनाती वाढवली गेली आहे. 2020 पासून, “एलएसी’जवळ शस्त्रांसह सुमारे 50 हजार भारतीय सैनिक तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून चीनने भारतीय भूमीवर कब्जा करू नये. त्यामुळे चीनी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत केवळ कांगावा करत असल्याचे उघड आहे.
अरुणाचल -अक्साई चीनवरूनही वाद
– 3488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये वाद
– अरुणाचल प्रदेशची चीनशी 1126 किमी लांबीची सीमा व चीनशी 520 किमी लांबीची सीमा
– अरुणाचल हा पारंपारिकपणे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा
– भारताचा 1962 च्या युद्धात चीनने ताब्यात घेतलेल्या अक्साई चीन भागावर दावा