नवी दिल्ली – दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर चीनने सीमेवर जमवाजमव केली आहे. सज्जताही वाढवली आहे. भारतानेही गाफील न राहता आपल्या परीने तयारी सुरू केली आहे. असे असतानाच आता चीनच्या सरकारी वृत्तपत्रांतून मात्र चीनने वेगळाच सूर लावला आहे. त्यानुसार चीनला भारताशी युध्द नको आहे, असे सूचविण्यात आले आहे.
लडाख भागातील संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झाले. ही घटना भारताला हादरवणारी होती. देशात संतापाची लाट असताना भारत सरकारवर दबाव वाढला आणि भारतानेही चीनच्या विरोधात काही पाउले उचलण्यात सुरू केली आहेत. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची जमवाजमव तर आहेच, मात्र आर्थिक बाबींचेही निर्णय घेत भारताने चीनला आपले इरादे स्पष्ट केले आहे. अगोदर दुर्लक्ष केल्यानंतर आता चीनकडून सरकारी पातळीवर भारताच्या या निर्णयांच्या संदर्भात प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. त्यावरून भारत योग्य मार्गावर असून चीन जेवढे दाखवतो तेवढा निश्चल नाही असे उघड होत चालले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
लडाखच्या गलवान येथील घटनेनंतर भारताच्या प्रसार माध्यमांत आणि समाज माध्यमांतही चीनच्या विरोधातल नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारताचा नारा देतानाच चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जोरकसपणे लावून धरले जात आहे. सबुरीचा सल्ला देणारे मेसेजेसही आहेत. मात्र कधीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि चीनच्या संदर्भात निर्णय घेण्याची हीच वेळ असल्याचे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात अर्थतज्ञांपासून राजकारण्यांपर्यंत बहुतेक जणांचा समावेश असल्यामुळे आणि देशातील एकूण रागरंग पाहून सरकारही काही धाडसी निर्णय घेत आहे.
आर्थिक आघाडीवर भारताने काही निर्णय घेतले आहेत. काही ठिकाणी चीनी कंपन्यांना हद्दपार केले जाण्याच्या घोषणाही मंत्री पातळीवर करण्यात आला आहे. चीनी वस्तू भारतीयांच्या जीवनमानाचा अविभाज्य घटक असल्याचे अन त्यांच्या अंगवळणी पडल्या असल्याचे चीनच्या सरकारी माध्यमाने मध्यंतरी मोठा आव आणून सांगितले होते. ते सगळेच नाकारता येणार नाही. कारण बऱ्याच वस्तू भारतीयांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. उत्पादनाच्या अनुशंगाने विचार करायचा तर मध्यंतरी तज्ञांनी सेक्टर नुसार कोणत्या क्षेत्रात आपण चीनवर किती अवलंबून आहे, याचाही गोषवारा दिला होता. आत्मनिर्भर होताना हे बिंहष्कारास्त्र निकामी ठरू शकते असा सावधानतेचा इशाराही दिला होता.
मात्र आता सरकारच्या पातळीवरच होणारी घोषणाबाजी पाहता यावेळी प्रकरण हाताबाहेर गेल्याचे चीनच्या माध्यमांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी सबुरीचा राग आळवण्यास सुरूवात केली आहे. 59 चीनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता भारत केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड मशिनरी आणि फार्मास्युटीकल्समधून चीनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार कमी होईल आणि आर्थिक दरी वाढत जाईल. याचा चीनला फटका बसेलच, पण नंतरच्या टप्प्यात भारतालाही याची झळ बसेल. आशिया क्षेत्राकडे आज जगाचे आर्थिक नेतृत्व करण्याची महाशक्ती होण्याची क्षमता आहे. अशा वेळी युध्द होउन उपयोग नाही. चीनला भारतासोबत युध्द नको आहे असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.