नवी दिल्ली – सागरी हद्दींच्या मुद्यावरून आक्रमण न करण्याचा बहुप्रलंबित करार आज चीन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये करण्यात आला. दक्षिण चीन समुद्रामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या सीमावादाच्या मुद्यावरून एकमेकांच्या जहाजांवर होणाऱ्या आक्रमणांना यामुळे ब्रेक लागण्याची आशा आहे.
“आसियान’च्या 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान चीनच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या या करारानुसार दक्षिण चीन समुद्रातील वाहतुकीसंदर्भातील आचारसंहितेसाठीच्या वाटाघाटींचे निकष निश्चित करण्यात आले. चीन आणि आसियान यांच्या संयुक्त कार्यगटाने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रभावी आणि ठोस आचारसंहितेची वाटाघाटी 3 वर्षात म्हणजे 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे या करारात ठरले आहे.
चीन आणि तैवानसह ब्रुनेई, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम हे ‘आसियान’चे चार सदस्य दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त जलमार्गाच्या हद्दीच्या मुद्यावरून अनेक दशकांपासून वाद घालत आहेत. हा जलमार्ग जागतिक व्यापारासाठी महत्वाचा जलमार्ग आहे. तसेच या जलमार्गामध्ये तेल आणि खनिजांचे मोठे साठे आहेत, असे मानले जाते आहे. अमेरिका आणि चीन दरम्यानच्या स्पर्धेमुळे या सागरी जलमार्गात नेहमीच तणाव राहिलेला असतो.