पुणे -रेल्वेत लहान मुलगा एकटाच प्रवास करत असल्याचे लक्षात आले. रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांनी तातडीने मुलाची चौकशी केली. मात्र, त्या गोंधळलेल्या मुलाला स्वत:ची माहिती देता येत नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी मुलाला आरपीएफच्या जवानांकडे सोपवले. त्यानंतर आरपीएफने पुढील तपास करत मुलाला पालकांकडे सुखरुप सुपूर्द केले. ही घटना शुक्रवारी इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये घडली.
पुणे ते मुंबईदरम्यान दि.2 जुलै रोजी धावणाऱ्या इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये “डी 8′ या बोगीत हा मुलगा बॅगसह एकटाच बसल्याची बाब समोर आली. कल्याण येथे ट्रेन थांबली असता, पालक आणि मुलामध्ये चुकामुक झाल्याचे पुणे विभागाचे वरिष्ठ तिकीट निरीक्षक राजेंद्र काटकर यांच्या ध्यानात आले. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पुढील प्रक्रिया पूर्ण करत हा लहानग्याला पालकांकडे सोपविण्यात आले.
कल्याण स्थानक येथे रेल्वेत बसलेला एकटा लहान मुलगा आणि बॅग पाहून नागरिकांमध्ये देखील गोंधळ सुरू झाला होता. त्यावेळी काटकर यांनी त्या मुलाची चौकशी केली. बोगीमध्ये उपस्थित असणाऱ्यांकडे काटकर यांनी चौकशी केली असता, संबंधित मुलाला एका व्यक्तीने बोगीत बसवले. त्यावेळी रेल्वे सुरू झाली, मात्र ती व्यक्ती चढू शकली नसल्याचे सांगण्यात आले.
तर मुलाला विचारणा केली असता, घाबरून रडत असलेल्या मुलाला त्याचे नाव सांगता आले नाही. या प्रकाराबाबत काटकर यांनी कंट्रोल ऑफिसमध्ये ही बाब कळवली. त्यानंतर दादर स्थानकात रेल्वे थांबल्यानंतर काटकर यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडे मुलगा आणि बॅग सोपवली. तर आरपीएफ जवानांनी या घटनेचा तपास करत संबंधित मुलाला परिवाराकडे सोपवले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.