पिंपरी – यंदा करोनाचे संकट घोंघावत असले, तरीदेखील सध्या करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने मित्र कंपनीला गोळा करून माती, दगड गोळा करून किल्ला बांधणीला या बच्चे कंपनीची धावपळ सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे करोनाच्या दहशतीखाली आठ महिने घालविल्यानंतर बच्चे कंपनीची किल्ले तयार करण्याची लगबग व चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहताना दिसत आहे.
दिवाळी म्हटले की किल्ले तयार करण्याची लगबग बच्चे कंपनीत सुरू होते. भव्य बुरूज त्यावर अभिमानाने उभ्या असलेल्या तोफा, तटबंदीवरून दऱ्याखोऱ्यांवर नजर ठेवून गस्त घालणारी मावळ्यांची फौज, गडाच्या पायथ्याशी भरलेला बाजार, पाणी भरण्यासाठी घोळक्याने जाणाऱ्या गवळणी.
डोंगराच्या एखाद्या गुहेत परिसर न्याहाळत बसलेला वाघ, तर कुठे कुरणावर निवांत चरणारी जनावरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाजी स्वप्नवत वाटणारे हे दृश्य सध्या पहायला मिळत आहे.
दिवाळीच्या आनंदपर्वात लहानथोरांसह सर्वच न्हाऊन निघतात. त्यातल्या त्यात बच्चे कंपनीच्या उत्साह पाहण्याजोगा असतो.