मुंबई – राज्याच्या शाळांतील इयत्ता नववी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांकडून लेखी संमती गरजेची असेल. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड अर्ध्या वर्गाला बोलवायचे असून (50 टक्के ऑनलाइन, 50 टक्के प्रत्यक्ष) एक बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार आहे.
शाळांमध्ये हे आवश्यक-
शाळेमध्ये थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या सर्वांची उपलब्धता असणे आवश्यक असेल. वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण, अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. शाळेतील क्वारंटाइन सेंटर दुसरीकडे नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवण्याचे निर्देश सरकारने आहेत.