Buldhana Bus Accident – प्रत्यक्ष पाहिल्या नंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दिड वाजता हा अपघात घडला. गाडी खांबाला धडकली आणि डिजल टँकचा स्फोट झाला. गाडी पुढे घासत गेली आणि गाडीने पेट घेतला. जखमींवर चांगले उपचार करण्यात येतील. असं मुख्यंत्री एकनाथ शिंदे अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर म्हणाले आहे.
शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,’या अपघातात २५ लोकांना वाचवता आलं नाही. ही दुखद घटना आहे. समृध्दीवरील जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. चालकांना झोप लागल्यामुळे अपघात होतात. मात्र असे अपघात होऊन चालणार नाही, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. ते पुढे म्हणाले,’यंत्रणा जागेवर पोहोचली होती. मात्र ट्रॅव्हल्सचा दरवाजा बंद होता. नाहीतर आणखी लोकांना वाचवता आले असते. फिटनेसमुळे काही गाड्या आम्ही वापस पाठवतो. चालकांचे समुपदेशन देखील होते. तरी देखील अपघात होऊ नये म्हणून सरकार सर्व गोष्टी करेल.’ असेही शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.