पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली ध्येयनिष्ठता पुढे अटकेपार झेंडा फडकवेपर्यंत होती. त्यानंतर मात्र स्वतःचा स्वार्थ बघितला जाऊ लागला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात प्रतिपक्ष इस्लामी राज्य म्हणून लढला, परंतु मराठ्यांचे सैन्य हिंदू म्हणून लढले नाही. आजही तीच लढाई कायम आहे. असुरांशी लढाई आहे आणि त्याची केंद्रही भारतच आहे. छत्रपती शिवरायांची विजिगीषू वृत्ती भारताला पुढे न्यायची आहे. शिवाजी महाराजांच्या या कौशल्याचा युद्धशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या आणि प्रशासन अंगाच्या दृष्टीने अभ्यास होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले.
आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील “श्री शिवाजी मेमोरियल कमिटी’ आणि “श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ यांच्यावतीने डॉ. केदार फाळके लिखित “शिवछत्रपतींचा वारसा- स्वराज्य ते साम्राज्य 1600-1818′ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत, कमिटीचे सचिव जी. रघुरामय्या, उपाध्यक्ष उदय खर्डेकर आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात “दी लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी-किंगडम टू एम्पायर 1600-1818′ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनही भागवत यांच्या हस्ते झाले.
इस्लामी आक्रमणापुढे भारताचा टिकाव लागणार की नाही, तो टिकणार की नाही याचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात मिळाले. कारण, या इस्लामी राजवटीला पहिला यशस्वी विरोध महाराजांनी केला. इस्लामी आक्रमणाला विरोध करण्याचा विचार अनेक वर्षे सुरू होता. त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील त्रुटींचा अभ्यास महाराजांनी केला आणि त्यांच्या संघटित शक्तीमुळे महाराष्ट्र टिकला. महाराजांचा आदर्श हा त्रिकालाबाधित होता, असे भागवत म्हणाले. रावत आणि फाळके यांनी मनोगत व्यक्त केले. खर्डेकर यांनी प्रास्ताविक, सुधीर थोरात यांनी आभार मानले. मोहन शेटे यांनी सूसंचालन केले.