छत्रपती शिवाजी महाराज या महाप्रतापी राजाचा 19 फेब्रुवारी हा जन्मदिन! केवळ या दिवशीच नव्हे तर दररोज आपण त्यांचे स्मरण करावे इतकी त्यांची पुण्याई! पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी या आक्रमकांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते. तथापि भारतातील पौर्वात्य राज्यकर्त्यांची नौकानयनाची परंपरा जास्त करून शांततापूर्ण, व्यापारी स्वरूपाची होती. शिवाय इंग्रज, डच, पोर्तुगीज किंवा सिद्दी यांच्याकडून आरमार उभे करण्याची महत्त्वाची विद्या राजेंना मिळणे अशक्यच होते.
आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र!’ आरमाराची आवश्यकता सांगताना शिवाजी महाराजांनी हे आग्रहपूर्वक सांगितले. निजामशाही, कोकण ताब्यात आल्यावर लवकरच शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी व पेण येथे युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. ते कळल्यावर पोर्तुगीजांचे सल्लागार मंडळ म्हणते, “शिवाजी बलाढ्य असल्याने, तसेच कल्याण भिवंडीचा व त्या परिसरातील सर्व कोकणचा मालक असल्याने ते आमचे बरेच नुकसान करू शकतात. त्याच्याशी मैत्री टिकवणे आवश्यक आहे.’ या पत्रावरून शिवाजी महाराजांचा परकीयांवर किती वचक होता हे लक्षात येते.
शिवाजी महाराजांना सागरी सामर्थ्याचे महत्त्व ठाऊक होते; म्हणूनच त्यांनी आरमार निर्माण केले पण जमिनीवरील शत्रूंना तोंड देत राज्यविस्तार करण्यासाठी वाढत्या संख्येने भूसेना, विशेषतः घोडदळ बाळगणे आवश्यक होते. ते करून शिवाय सिद्दीच्या आरमाराचा कायमचा नाश करू शकेल एवढे प्रबळ आरमार लगेच निर्माण करण्याएवढे आर्थिक सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हते. मग सुरतेची लूट व आदिलशाही मुलखात लूट करून शिवाजी महाराजांनी आरमार उभे करण्यासाठी आर्थिक बळ उभे केले. जहाजबांधणी, जहाजांसाठी सुरक्षित बंदरे, जहाज-दुरुस्तीची तरतूद व या जहाजांसाठी लागणारे शिक्षित आरमारी सैनिक तयार करणे ही सर्व कामे त्यांनी चालूच ठेवली. इंग्रजांनी 26 नोव्हेंबर 1664 रोजी पाठवलेल्या पत्रात कंपनीला कळवले की, “शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत.’ यावरून लक्षात येते की, शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमारी बळाचा इंग्रजांनी चांगलाच धसका घेतला होता.
एप्रिल-मे 1675 मध्ये शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला जिंकल्यामुळे त्यांच्या ताब्यातील किनारपट्टीत वाढ झाली. मग आदिलशाहीला पश्चिमेकडे किनारपट्टीच उरली नाही! म्हणजे आदिलशहाचा मुलूख तर गेलाच आणि शिवाय अरबी समुद्रातून होणारा व्यापार शिवाजी महाराजांच्या हाती आला. ही गोष्ट महाराजांच्या वाढत्या नाविक सामर्थ्याला पोषक ठरली. जेतापूरहून मुंबईस पाठवलेल्या इंग्रजांच्या एका पत्रात असा उल्लेख आहे की, “शिवाजीकरिता युद्धनौका बांधण्याचे काम चालू असल्याने त्यांचे नोकर सापडतील ते सुतार, लाकडूकापे व लोहार यांना त्याच कामात जुंपत आहेत व त्यामुळे आपल्या कामासाठी कामगार मिळणे आणि त्याहीपेक्षा ते टिकवून ठेवणे कठीण होऊन बसले आहे.’ शिवाजी महाराजांच्या आरमार बांधणीच्या तयारीवर कंपनी सरकारचे बारीक लक्ष होते. त्यांच्या मते राजे “समर्थ व लोभी’ होते.
शिवाजी महाराजांनी शून्यातून आपले आरमार निर्माण केले. त्याकरिता नौका बांधण्याचे ज्ञान, समुद्राचे, वाऱ्यांचे व खगोलाचे ज्ञान, नाविक रणतंत्राचे ज्ञान अशा विविध ज्ञानशाखांचे ज्ञान आवश्यक होते. यांपैकी एकएक ज्ञानशाखा आत्मसात करायला एक आयुष्यही पुरे पडत नाही.
पाश्चातत्त्यांनी पिढ्यान्पिढ्यांच्या अभ्यासातून व अनुभवातून हे ज्ञान आत्मसात केले होते. बरं, नुसते हे ज्ञान संपादन करून आरमार निर्माण झाले नसते. त्याकरिता नौका बांधण्याची, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडतील असे जलदुर्ग बांधण्याची आणि माणसे प्रशिक्षित करण्याची आवश्यकता होती. हे सर्व फार मोठ्या खर्चाचे काम होते. अर्थात केवळ पैसा उपलब्ध करूनही भागण्यासारखे नव्हते. पोर्तुगीजांचा व सिद्दीचा विरोध असताना हे काम करायचे होते. हा सर्व उद्योग मोगलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना, जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होता. असे असूनही या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले; इतकेच नव्हे तर बसरूरच्या स्वारीत त्यांनी स्वतः त्या आरमाराचे नेतृत्व केले!
समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या मराठी माणसांनी इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले. सोळाव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात घुसू पाहणाऱ्या सर्व युरोपियनांवर मात केली. तरीही पुढील शंभर वर्षे मराठा राज्याच्या वाढीमुळे पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिशांना फारशी प्रगती करता आली नाही. याचे कारण होते शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार! भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही एतद्देशीय सत्तेने इंग्रजांशी नाविक युद्ध केले नव्हते आणि त्यानंतरही मराठ्यांखेरीज या देशातील इतर कोणत्याही सत्तेने ते केले नाही. आज हे सांगताना अभिमान वाटतो!
माधुरी तळवलकर