सत्ताधाऱ्यांना मिळाले आयते कोलित : विरोधक कसा खोडून काढणार हे पाहणे औत्सुक्याचे
बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती साखर कारखाना कळीचा मुद्दा बनला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत नीळकंठेश्वर पॅनलला मात देण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी माळेगावच्या राज्यातील उच्चांकी दराबरोबरच भवानीनगरच्या छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रचाराचा मुद्दा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या छत्रपती साखर कारखान्याच्या दुरवस्थेची पोलखोल चंद्रराव तावरे गटाकडून माळेगावच्या सभासदांसमोर केली जात आहे. तर आता हा मुद्दा पवार गटाकडून कसा खोडून काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा फड सध्या रंगात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नीळकंठेश्वर तर चंद्रराव तावरे गट सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. दोन्ही गटाकडून पॅनल जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विक्रमी वेळेत कारखान्याची विस्तारवाढ करून साखर उताराप्रमाणे राज्यात उच्चांकी भाव सभासदांना दिला असल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगितले जात आहे. काटकसर हीच निर्मिती असे धोरण राबवण्यात आले आहे. जास्तीचे भांडवल वापरून विस्तार करण्यात आले आहे. केवळ 85 कोटी कर्ज घेतल्याचे चंद्रराव तावरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे माळेगाव कारखान्याला विस्तारीकरणाची गरज नव्हती विस्तारीकरण करून कारखान्यावर 200 कोटींचे कर्ज केल्याच्या आरोप विरोधी गटाकडून होत आहेत. आरोप-प्रत्यारोप होत असताना सत्ताधारी गटाने छत्रपती कारखान्याच्या दुरवस्थेवर बोट दाखवत निवडणुकीत नीळकंठेश्वर पॅनलला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची विस्तार वाढ करण्यात आली; मात्र नियोजनशून्य कारभारामुळे यंदाच्या गळीत हंगामात कारखाना चालविण्यात अडचणी निर्माण झाल्या. पैशाअभावी कारखान्यावर तोडणी यंत्रणा पोहोचली नाही.
त्यामुळे विस्तारवाढ होऊन देखील छत्रपती कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही. त्यामुळे छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांचे नुकसान झाले. खासगी कारखानदारांनी छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवला. यामध्ये सभासदांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने हा मुद्दा माळेगावच्या निवडणुकीत येणार असल्याने उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना ही धोक्याची घंटा ठरू शकते; मात्र शरद पवारांनासोबत घेऊन यातून अजित पवार मार्ग काढू शकता, असे जाणकारांचे म्हणणे आहे
“हा’ मुद्दा कोणाला तारणार, मारणार?
एकीकडे चंद्रराव तावरे गटाच्या ताब्यात असलेला माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात उच्चांकी भाव देत आहे. तर राज्याचा कारभार हाकणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ताब्यात असलेला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मात्र, दयनीय अवस्था झाली असल्याचे माळेगावच्या सभासदांच्या निदर्शनास आणून देण्यात सत्ताधारी मंडळी कुठेही कमी पडताना दिसत नाही. छत्रपती कारखान्यांच्या कारभाराबाबत आपण समाधानी नाही असे अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर सभेत स्पष्ट केले आहे. त्याचाच फायदा सत्ताधारी मंडळी उचलताना दिसत आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत छत्रपती कारखान्याचा मुद्दा दोन्ही पॅनलपैकी कोणाला तारणार अन् मारणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
माळेगावातील विरोधकांमध्ये धास्ती?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 2015मध्ये झालेल्या निवडणुकीत खासगी साखर कारखानदारी या मुद्द्यावर अजित पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ती सल कायम असताना ऐन माळेगाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर काखान्याचे विस्तारवाढ होऊनही तो पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने छत्रपती कारखाना खासगीकरणाच्या वाटेवर असल्याचे कारखान्याचे विरोधात बोलत आहेत, त्यामुळे त्या कारखान्यातील विरोधकांशी माळेगावातील सत्ताधारी हात मिळवणी करून आले कार्य साधलील अशी धास्तीही माळेगावातील विरोधकांना लागून राहिल आहे.