सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरासह जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाहू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण साताऱ्यात झाले ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. महापुरुषांवर आपत्तीजनक विधाने करणाऱ्या संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कठोर कायदे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
येथील शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भीमसागर लोटला होता. सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून भीम ज्योती घेऊन येणारे अनुयायी यांनी शाहू चौकात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रिपाइचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, दादासाहेब ओव्हाळ, चंद्रकांत खंडाईत, किशोर गालफाडे, उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे तसेच शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, इसाक बागवान यांनी अभिवादन केले.
शाहू चौकामध्ये वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. तेथे भीमवंदना सांगणारी पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी थंड पाणी आणि न्याहारीची सोय करण्यात आली होती. शाहू चौक ते तालीम संघ मैदान यादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नगरपालिका समोरील मोकळ्या जागेमध्ये भीमगीते लावून तेथे येणाऱ्या भीमज्योतींचे स्वागत करण्यात येत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत १३३ किलोचा केक कापण्यात आला. अरूण जावळे यांच्या संकल्पनेतील एक पेन एक वही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील हरित वृक्ष संवर्धन ग्रुपच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक झाड लावा एक हजार रुपये मिळवा अशी अभिनव स्पर्धा आयोजित केली होती. या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना तज्ञ म्हणून थोर होते. जागतिकदृष्ट्या विचार करता भारतीय राज्यघटनेचा विचार केला,
तर ती अत्यंत रचनात्मक व्यापक आणि समाजातील सर्व जाती-जमातींचा विचार करणारी होती. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव जो सांगितला त्याचे प्रतिबिंब भारताच्या राज्यघटनेमध्ये दिसते. डॉ. आंबेडकर यांचे शिक्षण साताऱ्यात झाले ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
मात्र महापुरुषांच्या संदर्भाने काही स्वार्थी लोक वेगळ्या पद्धतीचे राजकारण करतात. त्यामुळे अशी आपत्ती जनक वक्तव्य करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे कायदे केंद्र शासन राज्य शासनाने पारित करावेत, अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण सातारा डॉ. आंबेडकरमय झाला होता. सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी भीम गीते आणि भीम वंदना सादर करण्यात आली. साताऱ्यात राजवाड्यावर वंचित बहुजन आघाडीच्या कलापथकाने या निमित्ताने पथनाट्य सादर केली.