मसूरी. डेहराडून – उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चारधाम यात्रा आज स्थगित करण्यात आली. मात्र गंगोत्री, यमुनोत्री, हेमकुंड साहिब आणि बद्रिनाथ येथील भाविकांची यात्रा सुरू राहिली आहे.
हेमकुंड येथील यात्रेला शनिवारपासून प्रारंभ झाला असून दररोज 5 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली गेली आहे. तेथे किरकोळ बर्फवृष्टी सुरू आहे. पण यात्रेमध्ये अडथळा येत नसल्यामुळे यात्रा सुरू ठेवण्यात आली आहे, असे हेमकुंड साहिब व्यवस्थापन विश्वस्तांनी सांगितले.
मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी केदारनाथ आणि रुद्रप्रयागच्या भाविकांची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. केदारनाथच्या मार्गावरील हवामान खराब असल्यामुळे उखीमठ, सोनप्रयाग आणि गौरीकुंडच्या भाविकांना जेथे असतील तेथेच पुढील सूचना मिळेपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे 10 हजार भाविक यात्रा पुन्हा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. भारतीय हवामान विभागाने, चार धाम क्षेत्रासाठीच्या आपल्या विशेष अंदाजानुसार, मंगळवारी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा जारी केला आहे.