पाथर्डी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा मोठ्या मताच्या फरकाने जिंकत राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात असलेली बाजार समिती हिसकावून घेत सत्ता परिवर्तन केले. ऍड. ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा विकास आघाडीला हमाल मापाडी मतदारसंघात बाबासाहेब केदार यांच्या रूपाने एका जागेवर समाधान मानावे लागले. केदार यांचा अवघ्या दोन मताने विजयी झाले.
शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातील सात जागांसाठीची मतमोजणी झाली. या सातही जागा राजळे गटाने मोठ्या जिंकल्यानंतर बाजार समितीत सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत मिळाले. या निकालानंतरच राजळे समर्थकांनी गुलालाची उधळन करत फटाके फोडले. त्यानंतर महिला राखीव जागांची मतमोजणी झाली. त्या पाठोपाठ इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जमाती, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण दोन जागांसाठी मतमोजणी झाली. अनु. जाती जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सर्व मतदारसंघात राजळे गटाने मोठ्या मताच्या फरकाने विजय मिळवला.
यानंतर हमाल मापाडी मतदारसंघात झालेल्या 111 मताची मतमोजणी झाली. याजागेवर 55 मते मिळवून जगदंबा विकास आघाडीचे बाबासाहेब केदार अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आ. राजळे मतमोजणी केंद्रात आल्या. मतदारांचे व निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
विजय उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. सेवा सोसायटी मतदारसंघ- जगन्नाथ खेडकर (643), वैभव खलाटे (636), नानासाहेब गाडे (636), अजय रक्ताटे (624), सुभाष बर्डे (620), मधुकर देशमुख (612), बाळासाहेब नागरगोजे (604) महिला राखीव- सुनीता कोलते (689), स्मिता लाड (672). इतरमागास वर्ग – अरूण रायकर (601), विमुक्त जाती व भटक्या जमाती- जिजाबा लोंढे (640), ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधरण- शेषराव कचरे (506), किरण राठोड (471), अनुसूचित जाती,जमाती- रवींद्र आरोळे (531), आर्थिक दुर्बल घटक- नारायण पालवे (549), व्यापारी, आडते मतदार संघ- प्रशांत मंडलेचा (262), कुंडलिक आव्हाड (237).
बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौल स्वीकार करतो. या निवडणुकीत सत्तेच्या दबाव तंत्राचा तसेच पैशांचा आणि धाकदापट शाहीचा वापर झाला. येथून पुढेही प्रस्थापितांच्या विरोधात असाच संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे म्हणाले.
राजकारणाची संस्कृती सोडून विरोधकांनी राजकारणवर बोलण्याऐवजी आमच्यावर खालच्या पातळीची टीका केली. पैसा, दडपशाही, दमदाटी या सर्व प्रकारचा विरोधकांनी निवडणूकीत वापर करून वेगळा विषयाकडे ही निवडणूक घेऊन जाण्याचे काम केले. बाजार समितीचा चांगला कारभार त्यांना मागील सात वर्षात करता आला नाही. त्यावर त्यांना भाष्य करता आलं नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.