मुंबई – मुख्यमंत्री ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने मंगळवारी राज्यात वादळी घडामोडी घडल्या. राणेंना जामीन मंजूर झाला झाला असला तरी हे प्रकरण अद्याप निवळलेलं नाही. भाजप व शिवसेना नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करताना दिसतायेत. अशातच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला, ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ असा थेट इशारा दिला.
राणेंच्या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यालयांवर हल्ले चढवले होते. याबाबत वक्तव्य करताना बावनकुळे यांनी, “भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला, तर ईट का जवाब पत्थर से देंगे” असा इशारा दिला आहे.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. शिवसैनिकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत ठिकठिकाणी राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र मंगळवारी रात्री उशिरा महाड येथील न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला.
या सर्व प्रकरणाबाबत भाष्य करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या काही जुन्या वाटकव्याचा दाखला देत त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. राणे यांनी अटकेच्या कारवाईनंतर, आपण कोणालाही घाबरत नसल्याचे सांगतानाच यापुढे टीका करताना जपून करणार असल्याचेही सांगितले.
दरम्यान, राणे प्रकरणानंतर भाजप कार्यालयांवर शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत राज्यातील भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. बावनकुळे यांनी याबाबत बोलताना, ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ म्हणत भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचेच सूचित केले आहे. डिसेंबरपूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.