मुंबई : नाशिक विधानपरिषद उमेदवारीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाकडून विरोधकांवर निशाण साधला जात आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याविषयी बोलताना महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना भाजपाने पाठिंबा दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यासंदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचे संकेत दिले.
“सत्यजीत तांबेंनी अजून कुठलंही समर्थन मागितलेले नाही. त्यांनी समर्थन मागितलं, तर केंद्रीय संसदीय समितीकडे तशी संमती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असे म्हणत भाजपा तांबेंच्या पाठिशी उभी राहण्याची शक्यता बावनकुळेंनी व्यक्त केली आहे. तसेच, “भाजपा सध्या अपक्षाच्या भूमिकेतच आहे. आमचं समर्थन कुणाला असणार आहे, हे काळ ठरवेल”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्यावरून बोलताना बावनकुळेंनी मविआला खोचक शब्दांत टोला लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडीचे एक दिल के टुकडे हुए हजार, कही कहा गिरा, कही कहा गिरा’, अशी अवस्था झाली आहे”, असे बावनकुळे म्हणाले.