मुंबई : गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत कट्टर नक्षलवाद्यासह २६ नक्षलवादी ठार केले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच या कारवाईनंतर माझा ऊर अभिमानाने भरून आल्याची भावना व्यक्त केली. ज्या काळात विकास नव्हता तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं. पण आता सगळा विकास सुरू झाला आहे, असेही मत चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांचे कौतुक करताना म्हटले, “मी महाराष्ट्र पोलिसांचं खूप अभिनंदन करेल. माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. नक्षलवाद नावाची कीड समाजातून समूळ उखडून फेकली पाहिजे. ज्या काळात विकास नव्हता तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं. आता सगळा विकास सुरू झाला. सरकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणलं गेलंय. अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी सर्वस्व उठवणं बरोबर नाही.”
“नक्षलवाद्यांनी शरण आलं पाहिजे. त्यांनी सामान्य जीवन जगलं पाहिजे, अशीच राज्य किंवा केंद्र सरकारची भूमिका असते. त्यामुळे त्यांना जशास तसं उत्तर दिलं त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. मला त्यांचा खूप अभिमान आहे,” असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले आहे.