विठ्ठल वळसेपाटील
करोना काळात अन्नधान्याचे भाव वाढतच आहेत, याचे कारण बाजारभाव नसून मुळातच धान्य पीक उत्पादन कमी घेतले जाते. त्यामुळे कमी पुरवठा आणि मागणी जास्त या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार अन्नधान्य किमतीत सतत वाढ होत आहे. महाराष्ट्रात 1 ते 7 जुलै या कालावधीत “कृषी संजीवनी सप्ताह’ सुरू आहे. त्यानिमित्त…
करोनासारखे संकट जगावर कोसळले असून अनेक देशांची आर्थिकस्थिती कोलमडली आहे. हे संकट आज ना उद्या आटोक्यात येईल, तरी नव्याने दुसरीही काही संकटे उभी राहणारच आहेत. अशा वेळी देश वारंवार संकटात येऊ शकतो. ही संकटे दूर करण्याचे सामर्थ्य कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.
जंगलांचा नाश झाल्याने घटते पर्जन्य, लहरी पर्जन्यमान, दुष्काळाचं सावट यासर्व प्रतिकूल काळातही जीवन जगण्यासाठी अन्नधान्याची गरज प्रामुख्याने आहेच. ती गरज शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे म्हणूनच पूर्ण करू शकतो. धान्यपीक शेती जास्त प्रमाणात पिकवली तर आपल्या बांधवाना ते विकत घेणे सोयीचे होणार. धान्य व कडधान्य मुबलक असल्यास अनेक संकटांना सामोरे जाता येईल.
देशात आपले राज्य धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृतीची जोड देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती ही 1 जुलैला “कृषिदिन’ म्हणून साजरी झाली असताना कृषी क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्त…
भारत जगाला अन्नधान्य निर्यात करण्यात अग्रेसर आहे, त्यात महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे. महाराष्ट्रातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी 85 टक्के क्षेत्र जिराईत आहे. तर 15 टक्के बागायत क्षेत्र असून यात फळबाग, नगदी पिके घेतली जातात. खरीप हंगामात बाजरी, भात, मका, तूर, मूग, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल तसेच ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात.
रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा इतर तरकारी व नगदी पिके घेतली जातात. यात कडधान्य, डाळी व तेलवर्गीय पिके होतात. यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरली जातात. वार्षिक सरासरी 60 लाख मे. टन इतकी आहे. त्यामुळे सकस धान्य उपलब्ध होत नाही. त्यासाठी सेंद्रिय शेती उत्तम आहे. तरच भविष्यात रोग प्रतिकारशक्ती वाढेल व रोगांचा सामना करता येईल.
राज्यात जल सिंचनाची साधने उपलब्ध आहेत. विहीर, तळी, तलाव, नाले, बांधारे व धरणे पुरेशा प्रमाणात आहेत. अशा बागायत भागात बारमाही पिके घेतली जातात. शिवाय आंतरपिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यात सर्वाधिक ऊस, कांदा, तरकारी व फळबागा यांचे उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकरी नफ्याचा विचार करून पिके घेतात.
पालेभाज्यासारखी पिके वर्षातून चार वेळा घेतली जातात. चार-चार पिके घेताना एक पीक तरी धान्यपीक म्हणून घेतले पाहिजे.
सध्या कडधान्य व तेल यांचे भाव सर्वसामान्य माणसांना परवडणारे नाही. त्यामुळे कडधान्य जेवणात कमी प्रमाणात वापरले जाते. याचे भाव मर्यादित प्रमाणात ठेवायचे असेल तर धान्य व कडधान्य पिके अधिक प्रमाणात घेतली पाहिजेत.
करोनासारख्या साथीच्या आजाराची पार्श्वभूमी पाहिली असता रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे डोस दिले जात आहेत. मात्र, शेतीमधून मिळणारे अन्नधान्य सकस असेल तर कोणत्याही रोगांचा आपण सामना करू शकतो. रासायनिक खते व कीटकनाशके फवारणीमुळे अनेक आजार उद्भवतात म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याचा आग्रह धरला पाहिजे. धान्यपीक शेती कमी झाल्याने पक्ष्यांच्या तोंडचा घास गेला. त्यातच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने अनेक पक्षी संकटग्रस्त आहेत.
सध्या पिकांना फवारणी शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आपोआप निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य उत्पादन करावे लागत आहे. चारा पिकांबरोबर धान्यपिके घेतल्यास पर्यावरणाचा समतोलही साधता येईल आणि मर्यादित बाजार भावही राखता येईल.
चांगल्या पीक शेतीचे सध्या औद्योगीकरण करण्याचे उद्योजकांनी धोरण आखल्याचे दिसून येते. आधुनिक पद्धतीने शेती करण्याऐवजी त्यावर फार्म हाउस, गृहप्रकल्प आणि उद्योग व्यवसाय उभे करण्याने धान्यपीक शेती कमी प्रमाणात होऊ लागल्याने धान्य व कडधान्य, तेलबिया यांचे बाजारातील किमतीत वाढ होत राहणार आहे.
बागायत शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे कल असतो, तर जिरायत क्षेत्रात धान्य, कडधान्य व तेलबिया घेण्याकडे कल असतो. पर्जन्यमान्य घटल्यास दुष्काळामुळे शेती जळून जाते. आज करोनाचे संकट पाहता पुढील काळात सरकारवर धान्य खरेदीसाठी मोठा ताण येणार आहे. येणाऱ्या संकटांची नांदी मणून धान्यपीक शेतीकडे डोळसपणे पाहण्याची काळाची गरज आहे.