सातारा -जिल्हा परिषदेची दि. 21 मार्च आणि पंचायत समित्यांची दि. 13 मार्चला मुदत संपत असल्याने पुढील चार महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश शनिवारी राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्व सूत्रे दि. 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्ह्यातील अकरा पंचायत समितींची सूत्रे सोमवारपासून (दि.13) गटविकास अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहेत.
करोनाची तिसरी लाट, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला दिलेली स्थगिती आदींमुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत होणार की, लांबणार याबाबत संभ्रम होता. गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने महापालिका, नगरपालिकांच्या वॉर्डांची हद्दवाढ केली. ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती.
याचबरोबर ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यातून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतल्याने यंदा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर शनिवारी राज्य शासनाने अध्यादेश काढून निवडणुका किमान चार महिने तरी घेणे शक्य नसल्याने आता जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांवर गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 20 मार्चला संपत आहे. जिल्हा परिषदेची 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी येणार आहे. पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 13 मार्चला संपत असून 14 मार्चपासून प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहणार आहेत.
नंदुरबारमध्येही विनय गौडा होते प्रशासक
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ असताना – मध्ये प्रशासकपदी नियुक्ती झाली होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ते सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.यापूर्वीच्या अनुभवाचा त्यांना सातारा येथे उपयोग होणार आहे.