नवी दिल्ली – कोरोना विषाणू संसर्गामुळे देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी आज मोदी सरकारतर्फे २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली.
केंद्र सरकारच्या या आर्थिक पॅकेजचे आत्मनिर्भर भारत अभियान असे नामकरण करण्यात आले असून याचा लाभ सर्व वर्गातील लोकांना होईल असे पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पॅकेज भारताच्या एकूण सकल उत्पनाच्या (GDP) १०% असून यातील सर्व उपाययोजनांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देतील असे स्पष्ट केले.
लॉक डाऊनबाबतची माहिती १८ मेपूर्वी
आपल्याला कोरोना संकटापासून देशाला वाचवायचेही आहे व पुढेही जायचे आहे असं स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार लॉक डाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणणार असल्याचे स्पष्ट केले. लॉक डाऊनचा चौथा टप्पा हा सर्वार्थाने वेगळा असणार असून त्याबाबतची सर्व माहिती १८ मेपूर्वी देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं.