राजगुरूनगर-(प्रतिनिधी): सोमवारी (दि. ११ मे) रोजी झालेल्या वादळी पावसात मंदोशी ता. खेड गावातील सुमारे १०० वर्षापूर्वीचे पिंपरीचे झाड चक्री वादळात पडल्याने या गावाचा इतिहास आणि वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे.
मंदोशी गावाचे वैभव म्हणजे “गोठणी” (गावातील महत्वाची जागा) वरचा पार व तेथील १०० पेक्षा जास्त वर्षाचे वडाचे व पिपरीचे झाड होते. गोठणीवरील कितीतरी आठवणी ग्रामस्थांच्या ह्रदयात अगदी ताज्या आहेत. मंदोशी मधील याच गोठनीवरील पारावर यात्रेच्या बैठका व्हायच्या, याच पारावर गावातील ग्रामस्थांचे यात्रेच्या बैठकित किती तरी वादविवाद व्हायचे. याच पारावरिल बैठकांमध्ये गावच्या यात्रेला महाराष्ट्रातील नामवंत तमाशे आणले गेले. याच गोठणीवर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भारूड किंवा तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम व्हायचा. आहुप्याचा तमाशा, भिवेगावचा तमाशा, उगलेवाडीचा तमाशा व कितीतरी भारूडांचे खेळ यात्रेनिमित्ताने व्हायचे. याच गोठणीवर यात्रेतील बर्फाची गारीगार खात पहायचो. रेवडयांची, लाडुची, भेळेची व बांगडयांची दुकाने लागायची, हे सर्व यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र असायाचं.
या गोठनीवर याच पारावरील वड आणि पिपरीची फळे खाण्यासाठी गावातील मुले दिवसभर पारावर असायची. याच गोठणीवर घिसाडी त्याचा भाता लावायचा. याच गोठणीवर चांभार बंधू बैल बडवायचा, बैलाच्या पायातील काटे काढायचा. याच गोठनीवर अनेक गाई, गुरे झाडांच्या सावलीत उन्हाळ्यात दिवसभर बसायाची. याच गोठनीवर मुले क्रिकेट खेळायची. याच पारावर लग्नाचे आहेर वाजवत गाजवत लग्नमंडपा पर्यत नेले जायचे.
परंतू काळ बदलला. वडाचे झाड काही दिवसांपूर्वी जमीनदोस्त झाले. भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यामुळे व ओढ्यावरील पुलामुळे गोठन कालबाह्य झाली. आणि काल सोमवारी दि. ११रोजी चक्रीवादळात शेवटची आठवण असणारे पिपरीचे झाडही कोसळले. गावातील ग्रामस्थ या घटनेमुळे सुन्न झाले आहेत त्यांच्या मनातील अनेक आठवणी काळाच्या पडद्याआड झाल्या आहेत लहाणापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंतच्या येथील पारावरील व गोठणीवरील सर्व आठवणी तरळुन गेल्या.मंदोशी गावात पावसानंतर काच सन्नाटा आला. ज्यांनी या पिंपरीच्या झाडाखाली दिवस घालवले त्यांचे डोळे ओले झाले आहेत. गावातली सर्वात शेवटची आठवण नष्ट झाली.
याबाबत येथील रामदास तळपे यांनी सांगितले कि, गावातील सर्वात जुनी आठवण आज चक्रीवादळामुळे काळाच्या पडद्याआड होणार असल्याने आमच्या भावना अनावर झाल्या चक्रीवादळात अनेकांच्या घरांचे नुकसान झाले मात्र त्याचे दुःख नाही ती घरे दुरुस्त होतीलही पण गावाचे गावपण सांभाळणारे शे दीडशे वर्षाचे पिंपरीचे झाड खोडापासून उन्मळून पडले याचे आम्हा ग्रामस्थाना मोठे दुःख होत आहे.