मुंबई – काश्मिरात दहशतवाद्यांकडून पाच लष्करी जवानांची हत्या करण्याचा जो प्रकार घडला आहे, त्याचा केंद्र सरकारने त्वरेने सूड उगवला पाहिजे आणि या पाच जणांच्या बदल्यात पाकिस्तानचे 25 जवान ठार मारून त्याचा बदला घेतला पाहिजे, अशी सूचना शिवसेनेने केंद्र सरकारला केली आहे.
सध्या काश्मिरातील वातावरण अत्यंत खराब झाले आहे. 1990 च्या सुमाराला काश्मिरात जी स्थिती होती तीच स्थिती तेथे निर्माण झाली आहे, अशी चिंताही शिवसेनेने आपल्या अग्रलेखात व्यक्त केली आहे.
त्याच काळात काश्मिरी पंडितांना तेथून निर्वासित व्हावे लागले. या काश्मिरी पंडितांचा विजनवास संपावा म्हणून कलम 370 रद्द केले गेले. जम्मू काश्मीरचे तमाम विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर काश्मिरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत.
या पार्श्वभूमीवर पाच लष्करी जवानांच्या हत्येचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा पाच के पच्चीस असा जबरदस्त सूड उगवला पाहिजे, अशी सूचनाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.