संभल – नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना शांततेचा भंग केल्याचा आरोप ठेवून उत्तर प्रदेशातील सहा शेतकरी नेत्यांना 50 हजार रुपयांचा व्यक्तीगत जातमुचलका जमा करण्यास सांगितले आहे. भारती किसान युनियन (असली) जिल्हाध्यक्ष राजपालसिंह यादव, शेतकरी नेते जाईवीर सिंह, ब्रह्मचारी यादव, सत्येंद्र यादव, राऊदास आणि वीरसिंह अशी त्यांची नावे आहेत.
नव्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात या नेत्यांनी जिल्ह्यात निदर्शने आयोजित केली होती. “”हयातनगर पोलिसांकडून काही शेतकरी नेत्यांना 50 हजार रुपयांचा व्यक्तीगत जात मुचलका भरण्यास सांगितले आहे, असा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती उपविभागीय न्यायदंडाधिकारी दीपेंद्र यादव यांनी दिली. शेतकऱ्यांनी ही रक्कम खूप मोठी असल्याचे सांगितल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी दुसरे 50 हजाराचे समन्स बजावले, असे त्यांनी सांगितले.
जातमुचलका भरणार नाही
हा जातमुचलका आपण भरणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी नेते राजपलासिंह यादव म्हणाले, ते आम्हाला फाशी देवोत अथवा कारागृहात पाठवोत आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतच राहणार.
आमच्यापैकी कोणीही अथवा कोणाच्या कुटुंबियांनी या जातमुचलक्यावर सही केली नाही. आम्ही शांततेने निदर्शने करत आहोत कोणताही गुन्हा करत नाही.