सिल्लोड – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचे मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. यामुळे आता अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी याबाबत 27 ऑक्टोबर 2021 रोजी याचिका दाखल केली होती. निवडणूक शपथ पत्रात सत्तार यांनी खोटी माहिती दिल्याची ही तक्रार होती. त्यानंतर तपास सुरु करण्यात आला होता. सत्तार यांच्या एकूण चार ते पाच मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचं सिल्लोड न्यायालयाच्या तपासात आढळून आले आहे.
महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यावर समाधान न झाल्यानं शंकरपल्ली यांनी दोन वेळा न्यायालयात धाव घेतली. तिसऱ्यांदा न्यायालयाने मुद्देनिहाय तपासाचे आदेश देत त्यांचा जबाब नोंदवला. अब्दुल सत्तार यांनी 10 जुलै 2023 रोजी याप्रकरणी आपले मत सादर करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने तो नामंजूर केला.
त्यानंतर न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले. यामुळे आता अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासह 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरू शकतात.