फलटण प्रतिनिधी) – फलटण तालुक्यात करोना संसर्गाचा वेग वाढत असून बाहेरून आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात ही संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बाहेरगावाहून आलेल्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करताना करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन आ. दीपक चव्हाण यांनी केले आहे.
करोना नियंत्रण उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, गटविकास अधिकारी अमिता गावडे, फलटण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा. रणजितसिंह म्हणाले, लॉकडाऊनमुळे बंद पडलेले उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी नियोजन करावे. आगामी काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी ग्राम समित्या व ग्रामस्थांनी नियोजन करावे. संजीवराजे म्हणाले, पुणे, मुंबईतून येत असलेले लोक आपलेच असून त्यांचे स्वागतच केले जाईल; परंतु त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. त्यांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियमांची व आदेशांची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे. नीरा नदीवरील गोखळी पूल व बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केल्याने आसू परिसरातील ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. गोखळी पुलावरील वाहतूक त्वरित सुरू करण्याची मागणी शिवरूपराजे यांनी केली.